
लग्न लावून दिले नाही म्हणून संताप; वडील आणि सख्ख्या भावाचा दगडाने ठेचून केला खून
नारायणगाव : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच लग्न लावून दिले नाही हा राग मनात ठेवून वडील आणि सख्ख्या भावाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. याप्रकरणी ओतूर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
बाबाजी जयराम मुकणे (रा. बगाडवाडी, पारगाव तर्फे मढ, ता. जुन्नर, जि. पुणे) याला अटक केली आहे. त्याने त्याचे वडील जयराम महादू मुकणे (वय ६५) तसेच भाऊ राजू जयराम मुकणे (वय ३०, दोघेही रा. बगाडवाडी, पारगाव तर्फे मढ ता. जुन्नर जि. पुणे) यांना लाकडी चोपणीने मारहाण करून त्यांच्या डोक्यात दगड टाकून त्यांचा खून केला.
याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती ओतूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी दिली. याप्रकरणी युवराज जयराम मुकणे याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपीचे वडील आणि भाऊ लग्न लावून देत नाही या कारणावरून आरोपीने बगाडवाडी परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये वडील आणि भावाचा खून केला. या घटनेचा तपास स्वतः बाजगीरे करत आहेत.
दरम्यान, बायको निघून गेल्याने मानसिकदृष्ट्या बाबाजी खचला होता. त्याची पत्नी चार ते पाच वर्षांपासून त्याला सोडून माहेरी गेली होती. त्यामुळे तो नैराश्येत होता. ‘माझे दुसरे लग्न लावून द्या’ असा तगादा त्याने वडील आणि भावाच्या मागे लावला होता. त्याच स्थितीत त्याने हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे.
महिलेच्या प्रियकराने केली चार वर्षांच्या चिमुकल्याची हत्या
दुसरीकडे, ठाणे जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका चार वर्षांच्या मुलाचा त्याच्या आईच्या प्रियकराने अमानुष मारहाण करून हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपीने मुलाला इतक्या क्रूरतेने मारहाण केले की त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपींनी सुरुवातीला या घटनेला नैसर्गिक मृत्यूचा बनाव केला. मात्र, पोलिसांनी तपास करत याचा छडा लावला. ही घटना ठाण्यातील काश्मीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.