सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : राज्यात अपघाताच्या घटना वाढल्या असून, अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. पावसापासून बचाव करण्यासाठी कासारवाडी मेट्रो स्टेशनसमोर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दुचाकीस्वारांना शिवाई बसने धडक दिल्याची घटना सोमवारी (दि. 22) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास घडली आहे. या अपघातात तिघेजण जखमी झाले असून, त्यांच्यावर पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पाऊस सुरू असल्याने पाच ते सहा दुचाकीस्वार कासारवाडी मेट्रो स्टेशनसमोर थांबले होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या शिवाई बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने दुचाकींना जोरदार धडक दिली. यातील एक दुचाकी थेट बसखाली अडकली. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच पोलिस व आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. जखमी तिघांना उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी दापोडी पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे.
पिकअपच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू
पैठण तालुक्यातील विहामांडवा-चौंडाळा मार्गावरील सहकारी साखर रेणुकादेवी-शरद कारखान्यासमोर रविवारी (२१ जून) रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पारधी कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. साखर रेणुकादेवी-शरद सहकारी कारखान्याच्या मागील बाजूस वास्तव्यास असलेल्या पारधी कुटुंबातील पाच जण दोन मोटारसायकलींवरून प्रवास करत होते. यावेळी समोरून येणाऱ्या पिकअप (क्र. एमएच १७. के. ९०७७) लोडिंग वाहनाची मोटारसायकलशी समोरासमोर जोरदार धडक झाली. भरधाव पिकअपने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील सिद्धार्थ भैय्या चव्हाण (वय ३०), पायल सिद्धार्थ चव्हाण (वय २७), आव्हान्या सिद्धार्थ चव्हाण (वय ५), संजना अभिषेक चव्हाण (वय २२) यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि पारधी समाजातील मोठ्या संख्येने लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच घटनास्थळी मोठी गर्दी जमल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक हरी बोबडे यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.






