चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून तिघांची फसवणूक; तब्बल 55 लाखांना घातला गंडा
पुणे : राज्यात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता एक मोठी बातमी समोर आली आहे. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवत तिघांची ५५ लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी वारजे माळवाडीत एक आणि वाघोली पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात एका ४२ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्या व्यक्तीची ३२ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार कर्वेनगर परिसरात राहतात. ते नोकरी करतात. त्यांना नोव्हेंबर २०२४ मध्ये अनोळखी व्यक्तीने मोबाइलवर शेअर बाजारातील गुंतवणुकीची माहिती देणारा मेसेज टाकला. त्यांनी मॅसेज पाहून त्यातील लिंक ओपन केली. तेव्हा सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी चॅट करत गुंतवणुकीचे आमिष दाखवले. चांगली रक्कम मिळेल असेही सांगितले. तक्रारदारांनी काही रक्कम गुंतवली. त्यावर सायबर चोरट्यांनी परतावा देऊन त्यांचा विश्वास संपादित केला. नंतर तक्रारदाराला अधिकाधिक रक्कम गुंतवण्यास सांगितले. तक्रारदाराने ३२ लाख ९० हजार रुपये गुंतवणूक केली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तक्रारदाराकडे अधिक पैशांची मागणी केली. तसेच, परतावा देणेही बंद केले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
अशाचं पद्धतीने वाघोली परिसरात देखील दोन व्यक्तींना गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी वाघोली पोलिसांत दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत. त्यात ३६ वर्षीय नोकरदाराची १२ लाख ८४ हजार रुपयांची आणि अन्य एकाची नऊ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. दोघांना देखील शेअर बाजारात गुंतवणूक करायला सांगून परतावा आणि मुद्दल परत केली नाही.
कोथरुडमधील व्यक्तीला ३० लाखाला गंडा
कोथरूड भागातील एका नोकरदार व्यक्तीला सायबर चोरट्यांनी टास्क तसेच युट्यूबला लाईक्स मिळवून देण्यासाठी तसेच ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असल्याच्या आमिषाने २९ लाख ६३ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ५३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने तपास करत आहेत.
निधी देण्याचे आमिष दाखवून सरपंचाची फसवणूक
गेल्या काही दिवसाखाली शिरुर तालुक्यातील एक सरपंच तसेच एका सामाजिक कार्यकर्त्याला एका बंटी बबलीने आम्ही स्वच्छ भारत अभियान विभागात कामाला असून, आमदार खासदारांसोबत ओळख असल्याचे दाखवून गावच्या विकास कामांना निधी देण्याचे आमिष दाखवत तब्बल सत्तावीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिरुर पोलीस येथे येथे सुदर्शन म्हाळू उगले व सारिका सुदर्शन उगले या बंटी बबलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.