काय घडले नेमके?
शनिवारी सायंकाळी सुमारास मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गुजरातकडे जात असताना दानिश खान आणि त्याचा सहाय्यक सोनू पाल हे जय अंबे ढाब्यावर विश्रांतीसाठी थांबले होते. कोल्ड्रिंक घेतल्यानंतर टेम्पोची चावी हरवल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ढाबा मालकाकडे चौकशी केली.चावी परत मिळाल्यानंतर ढाबा मालकाने मंदिरासाठी 20 रुपये दक्षिणा देण्याची मागणी केली. सुट्टे पैसे नसल्याने चालकाने नकार दिला, यामुळे संतप्त झालेल्या मालकाने कामगारांसह चालकावर हल्ला चढवला.
खोलीत नेऊन अमानुष मारहाण
दानिश खान याला काउंटरलगतच्या खोलीत ओढून नेण्यात आले. त्याचे कपडे काढून लाकडी काठ्या आणि पट्ट्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर “आज तू इथून जिवंत जाणार नाही” अशी धमकी देत त्याच्या अंगावर आणि गुप्तांगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.दरम्यान, मदतीसाठी धावून आलेल्या सहाय्यक सोनू पाल यालाही मारहाण करण्यात आली.
पोलिसांची तत्पर कारवाई
अपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चालकाची सुटका केली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पुढील कारवाई
पीडित चालकाच्या तक्रारीवरून ढाबा मालक आणि संबंधित कामगारांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उशीरा रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या सगळ्या प्रकरणावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. या सगळ्याचा तपास सुरु असून नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.






