पुणे पॅटर्नचा धडा! नवी मुंबईत ‘दंडाची वसुली’ कधी होणार बंद? नागरिकांचा थेट सवाल
नवी मुंबईत नशामुक्त अभियानांतर्गत पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी अमली पदार्थांच्या विरोधात धडक कारवाई करत कौतुकास्पद आणि उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. ज्या प्रकारे त्यांनी नशामुक्त मोहिमेत कडक आणि ठोस निर्णय घेऊन शहराला दिलासा दिला, तसाच धाडसी आणि नियोजनबद्ध निर्णय नवी मुंबईच्या ट्रॅफिक समस्येबाबतही घेतला गेला, तर नवी मुंबईकरांसाठी ती अत्यंत आनंदाची आणि समाधानाची बाब ठरेल.
ठाणे बेलापूर रोड, खारघर टोल नाका ते रोडपाली, तुर्भे एमआयडीसी आणि पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या चौकांमध्ये दररोज तासंतास गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागतात. रस्त्यावर वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झालेले असताना, वाहतूक पोलीस मात्र वाहतूक सुरळीत करण्याऐवजी दंडात्मक कारवाया आणि पावती फाडण्यातच व्यस्त दिसतात. त्यामुळे पुणे पोलिसांप्रमाणेच नवी मुंबईतही सर्वसामान्य नियमभंगाच्या पावत्या फाडणे बंद करून केवळ वाहतूक नियमनाला प्राधान्य देणे काळाची गरज बनले आहे.
केवळ ई-चलन मशिन्स बंद करून चालणार नाही, तर वाहतूक पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची गरज आहे. गुगल मॅप्सवरील ट्रॅफिक अलर्ट पाहून ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी (उदा. उल्वे, वाशी, कोपरखैरणे, किंवा पीक अव्हर्सच्या वेळी होणारे जॅम) दर्शवली जाते, तिथे तात्काळ वाहतूक पोलिसांची जोडी तैनात केली पाहिजे.
ठाणे व इतर भागात जसे तंत्रज्ञानावर आधारित नियोजन केले जात आहे, तसेच नवी मुंबईतही सकाळ-संध्याकाळच्या पीक अव्हर्समध्ये रेड झोन असलेल्या ठिकाणी थेट ‘ट्रॅफिक क्लिअरन्स’वर भर दिला पाहिजे.
इ-चलन मशिन्सच्या माध्यमातून होणाऱ्या सततच्या दंडात्मक कारवाईचा सर्वाधिक फटका रोज कमावून खाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना, रिक्षाचालकांना आणि नोकरदारांना बसत आहे. आधीच वाहतूक कोंडीत वेळ वाया जात असताना, वारंवार होणाऱ्या दंडांमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर नाहक गदा येत आहे. त्यामुळे पोलिसांचा भर हा ‘दंडाधिकारी’ बनण्यापेक्षा ‘वाहतूक नियंत्रक’ बनण्यावर असावा.
पुण्याप्रमाणेच नवी मुंबईतही हा निर्णय लागू झाल्यास सामान्य वाहनधारकांना मोठा दिलासा मिळेल. अर्थात, मद्यपान करून वाहन चालवणे , बेकायदेशीर कॉर्नर पार्किंग, नो-एंट्रीत प्रवेश करणे किंवा जड वाहनांनी डावी लेन अडवणे अशा गंभीर आणि धोकादायक प्रकारांवर कडक कारवाई सुरूच ठेवली पाहिजे.
नवी मुंबईकरांना रोजच्या ट्रॅफिक जाममधून मुक्ती देण्यासाठी, नशामुक्तीप्रमाणेच ‘ट्रॅफिक कोंडीमुक्ती’ची मोहीम हाती घेऊन आयुक्त मिलिंद भारांबे पुण्याच्या धर्तीवर नवी मुंबईत ‘एनफोर्समेंट हॉलिडे’ आणि गुगल मॅप्स आधारित ट्रॅफिक मॅनेजमेंट लागू करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






