'विद्येचे माहेरघर' की गुन्ह्यांचे केंद्र? NCRB अहवालाने पुण्याचे भयावह वास्तव उघड; वर्षाला २,६३१ अत्याचार
NCRB Report 2024 Pune: ‘स्मार्ट सिटी’, ‘शैक्षणिक हब’, ‘आयटी हब’ आणि ‘संस्कृतीचे माहेरघर’ तसेच ‘सुरक्षित शहराची टिमटिमी’ मिरवणाऱ्या शहराच्या चेहऱ्यावर राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) २०२४ च्या अहवालाने काळा डाग उमटवला आहे. कारण, महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांनी शहरातील सुरक्षिततेच्या दाव्यांची पोलखोल तर केली आहेच पण पोलिस, प्रशासन आणि समाजव्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
शहराचा विस्तार वाढतवना आत्ता शहर सुरक्षित म्हणून देखील एक वेगळी ओळख निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. खूनापासून चोऱ्यापर्यंतच्या आकडेवारीत वर्षाला वाढ होत असतानाच महिला सुरक्षा देखील अत्यंत महत्वाची होऊ लागली आहे. आकडेवारीनुसार पुण्याची स्थिती चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे. नुकताच एनसीआरबीचा अहवाल प्रसिद्ध झाला असून, त्यातून भयावह वास्तव समोर आले आहे.
धक्कादायक, म्हणजे, बलात्कार, विनयभंग यासोबतच विवाहितांचे छळ, अॅसिड हल्ला, सामूहिक बलात्कार तसेच पाठलाग, चोरून व्हिडीओ काढणे, पाळत ठेवणे, अपहरण अशा घटनांत वाढ झाली आहे. पुण्यात २२४ मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या तब्बल २ हजार ६३१ घटना नोंदविण्यात आल्या आहेत. २०२२ मध्ये हा आकडा २ हजार ७४ इतका होता. अवघ्या दोन वर्षात महिलांविरोधातील गुन्ह्यांत २६.८६ टक्के वाढ झाली आहे. २०२३ मध्ये २ हजार ५५० प्रकरणे होती, त्यातही २०२४ मध्ये वाढ झाली आहे. म्हणजेच, महिलांविरोधातील गुन्हे रोखण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. हुंड्यासाठी छळ, बलात्कार, विनयभंग, स्टॉकिंग, अपहरण, लैंगिक छळ अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांनी महिलांचे दैनंदिन आयुष्य असुरक्षित केले आहे. विशेषतः २४४ बलात्काराच्या घटना आणि ६०२ महिलांच्या अपहरणाच्या तक्रारी ही आकडेवारी शहरातील भयावह वास्तवाचे चित्र आहे.
२०२४ मध्ये पुण्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. NCRB च्या आकडेवारीनुसार, २०२२ मधील २,०७४ वरून २०२३ मध्ये गुन्हे २५५० पर्यंत वाढले आणि २०२४ मध्ये हे आकडे अधिक वाढल्याचे सूचित झाले आहे, ज्यात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार (पोक्सो) ही मोठी समस्या बनली आहे.
२०२२ ते २०२४ या दोन वर्षांच्या कालावधीत महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये २६.८६% ची मोठी वाढ झाली असून, २०२४ मधील आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे. या वर्षात महिलांवरील शारीरिक आणि मानसिक छळाच्या घटना मोठ्या प्रमाणावर नोंदवण्यात आल्या आहेत. सर्वाधिक गुन्हे हुंड्यासाठी छळाचे (५१४) असून, त्याखालोखाल बलात्काराच्या २४४ घटना समोर आल्या आहेत. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून विनयभंगाच्या २२२, लैंगिक छळाच्या १५९ आणि स्टॉकिंगच्या १०५ प्रकरणांची नोंद झाली आहे. याव्यतिरिक्त, हुंडाबळी, सामूहिक बलात्कार, ॲसिड हल्ला (१९) आणि महिलांचे चोरून व्हिडिओ काढणे (२४) यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमुळे महिलांमधील भीतीचे वातावरण वाढले आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून विविध मोहिमा, हेल्पलाईन, पेट्रोलिंग, ‘निर्भया पथक’ यांसारख्या योजना राबवल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात गुन्ह्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. शहरात सीसीटीव्ही, स्मार्ट पोलिसिंग आणि महिला सुरक्षा उपक्रमांचे गाजावाजा होत असताना महिलाच जर रस्त्यावर, कार्यस्थळी आणि घरात सुरक्षित नसतील, तर असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महिलांविरोधातील वाढत्या गुन्ह्यांनी पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेची धोक्याची घंटा वाजवली असून, आता केवळ बैठका, घोषणाबाजी आणि आकडेवारी मांडून चालणार नाही. कठोर अंमलबजावणी, जलद न्यायप्रक्रिया आणि सामाजिक जबाबदारीची ठोस कृती हाच या परिस्थितीवरील खरा उपाय ठरणार आहे.






