सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : छळाला कंटाळून मृत्यूला जवळ करणाऱ्या महिलांसोबत आता पुरूषही अशा घटनांमध्ये आत्महत्या करू लागले आहेत. पुण्यातील बिबवेवाडीत सासरच्या जाचाला कंटाळून जावई असलेल्या तरूणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. पोलिसांनी आता याप्रकरणात आत्महत्येस जबादार असलेल्या सासरच्यांसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
तेजस तानाजी चाळेकर (वय २७, रा. बिबवेवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत शिला तानाजी चाळेकर (वय ४७, रा. नसरापुर, भोर) यांनी बिबवेवाडी पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी ऐश्वर्या विजय पिंगळे, विजय नामदेव पिंगळे, शितल विजय पिंगळे (सर्व रा. पौड ता. मुळशी), ऋषीकेश उर्फ भाई सुनिल खेडकर, सुनिल शिवलींग खेडकर, भुषण सुनिल खेडकर (रा. नसरापुर, ता. भोर, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार आशा सेविका असून त्या बिबवेवाडीत पती, मोठा मुलगा तेजस व लहान मुलासोबत राहतात. ८ ऑगस्ट २०२० मध्ये प्रेमसंबधातून तेजस आणि ऐश्वर्या यांचा विवाह झाला होता. त्यानंतर तेजसच्या घरच्यांनी दोघांचे धार्मिक पध्दतीने लग्न लावून दिले. लग्नानंतर दोन महिन्यात त्यांच्यात वाद होऊ लागले. कोरोनाच्या काळात तेजसचे दुकान बंद पडल्याने ऐश्वर्या व तेजस यांच्यात वाद वाढत गेला. त्यामुळे तिचे आईवडील तिला माहेरी घेऊन गेले. चार महिने माहेरी राहिल्यानंतर पुन्हा सासरी आली होती. परंतु, त्यांचे वाद काही थांबले नाही. ऐश्वर्याने तिच्या आई वडीलांना बोलवून गोंधळ घातला. तर, तेजस विरोधात घटस्फोट व पोटगीचा दावा दाखल केला. तर ऋषीकेश खेडकर हा ऐश्वर्या हिच्या आई वडीलांच्या सांगण्यावरून तेजसचा पाठलाग करत होता.
तर सुनिल खेडकर व भुषण खेडकर असे सर्व मिळून तेजसला मानसिक त्रास देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वादावादीत तेजस हा डिप्रेशनमध्ये गेला. या सर्व त्रासामुळे चाळेकर कुटुंबियांनी घर बदलले. ते लोअर इंदिरानगर येथे राहताना ९ ऑगस्ट रोजी घरात कोणी नसताना तेजसने राहत्या घरातील पंख्याला साडीने गळफास घेत आत्महत्या केली, असे तक्रारीत म्हंटले आहे. त्यानूसार गुन्हा नोंदवला असून, पोलिसांकडे अधिक तपास सुरू आहे.