( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Aashram 4 : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. लोकप्रिय वेब सिरीज ‘आश्रम’च्या चौथ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असताना आता या बहुप्रतीक्षित सीझनच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. बॉबी देओल पुन्हा एकदा बाबा निरालाच्या भूमिकेत दिसणार आहे.
शनिवारी बॉबी देओलने आपल्या टीमसोबत ‘आश्रम 4’च्या शूटिंगला सुरुवात केली. निर्माते प्रकाश झा प्रॉडक्शन्स यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर ‘आश्रम ४’ असे लिहिलेल्या क्लॅपरबोर्डचा फोटो शेअर करण्यात आला. एका प्रार्थनास्थळी हा क्लॅपरबोर्ड ठेवण्यात आला होता.
‘आश्रम ४’ची घोषणा करताना निर्मात्यांनी लिहिले, “आणखी एक सुरुवात… आश्रमाच्या एका नवीन अध्यायात आपले स्वागत आहे. जपनाम! आश्रम ४ चे चित्रीकरण सुरू झाले आहे!”
ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला. मागील तीन सीझनला मिळालेल्या दमदार प्रतिसादामुळे चौथ्या सीझनकडूनही प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.
‘आश्रम ४’मध्ये बॉबी देओल पुन्हा बाबा निरालाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत मागील सीझनमधील अनेक कलाकारही आपल्या भूमिका पुढे नेताना दिसतील.
अदिती पोहनकर पुन्हा पम्मीच्या भूमिकेत दिसणार असून चंदन रॉय सन्याल भोपा स्वामीच्या भूमिकेत परतणार आहे. याशिवाय दर्शन कुमार, अनुप्रिया गोएंका, ईशा गुप्ता, अध्ययन सुमन आणि त्रिधा चौधरी हे कलाकारही आपल्या भूमिकांमध्ये दिसण्याची शक्यता आहे.
प्रकाश झा दिग्दर्शित ‘आश्रम’ ही मालिका बाबा निराला या व्यक्तिरेखेभोवती फिरते. स्वतःला देवाचा दूत म्हणवणारा बाबा निराला श्रद्धेचा आधार घेत आपले साम्राज्य उभे करतो. या साम्राज्यामागे राजकारण, गुन्हेगारी, सत्ता आणि अंधश्रद्धेचे अनेक गडद पैलू दडलेले आहेत.
‘आश्रम’चा पहिला सीझन २८ ऑगस्ट २०२० रोजी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर दुसरा सीझन नोव्हेंबर २०२० मध्ये, तर तिसरा सीझन जून २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. तिन्ही सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता चौथ्या सीझनची उत्सुकता वाढली आहे.
‘आश्रम ४’पूर्वी बॉबी देओल अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘बंदर’ या चित्रपटात दिसला होता. याशिवाय तो वायआरएफ स्पाय युनिव्हर्सच्या ‘अल्फा’ आणि ‘जन नेता’ यांसारख्या अॅक्शन प्रोजेक्ट्समध्येही झळकला आहे.
आता ‘आश्रम ४’च्या शूटिंगला सुरुवात झाल्याने बाबा निराला आणि पम्मीच्या कथेचा पुढचा अध्याय नेमका काय वळण घेणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.






