
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
झी मराठीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेचा शुभारंभ एका अनोख्या आणि संस्मरणीय पद्धतीने करण्यात आला. कृष्णानदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात असलेल्या संगममाऊली घाटावर विशेष पत्रकार परिषद आणि प्रेक्षक भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमावर वसलेला हा घाट आपल्या मनमोहक वातावरणासाठी ओळखला जातो. हिरवाईने नटलेला परिसर, शांत नदीपात्र आणि आध्यात्मिक वातावरणामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा प्राप्त झाली. ‘कृष्णाईच्या लेकी’ ही एका आई आणि तिच्या तीन मुलींची हृदयस्पर्शी कथा असून, कुटुंब, नाती, संघर्ष आणि परस्परांना दिलेली साथ यांचा भावनिक प्रवास या मालिकेतून उलगडणार आहे.
मालिकेचे चित्रीकरण कोल्हापूरच्या कृष्णाईच्या मातीत झाले असल्याने शुभारंभासाठी संगममाऊली घाटाची निवड करण्यात आली. जसा नद्यांचा संगम एकतेचा संदेश देतो, तशीच मालिकेतील ‘कृष्णाई’ आपल्या कुटुंबाला प्रेमाने आणि विश्वासाने एकत्र बांधून ठेवते.
कार्यक्रमाची सुरुवात कलाकारांनी कृष्णा नदीची आरती करून केली. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थ, महिला आणि पत्रकारांसाठी मालिकेचा विशेष भाग प्रदर्शित करण्यात आला. गावकऱ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आतापर्यंत फक्त प्रोमो आणि टेलिव्हिजनवर पाहिलेले कलाकार प्रत्यक्ष भेटल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. अनेकांनी कलाकारांसोबत छायाचित्रे काढली आणि त्यांच्याशी संवाद साधला.
यानंतर मालिकेतील कलाकार एकता लब्दे (शारदा), ट्विंकल यादव (गौरी), नारायणी वर्ने (सौदामिनी), रोहित परशुराम (शंकर) आणि स्मिता सरवदे (सत्यभामा) यांनी आपल्या व्यक्तिरेखांबद्दल माहिती दिली. मालिकेत कृष्णाईची भूमिका साकारणाऱ्या निवेदिता सराफ यांनी कथेचा गाभा, व्यक्तिरेखांची वैशिष्ट्ये आणि प्रेक्षकांना या कथेशी सहज नाते कसे जोडता येईल याविषयी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी कलाकारांनी उपस्थितांना मिठाईचे खास डबे वाटप केले. खानावळ चालवणारी कृष्णाई जशी गोडधोडाशिवाय कोणत्याही नव्या गोष्टीची सुरुवात करत नाही, त्याचप्रमाणे या नव्या मालिकेच्या प्रवासाची सुरुवातही गोड आठवणींनी करण्यात आली.
यावेळी कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “संगममाऊली घाटावर झालेली ही प्रेस मीट आमच्यासाठी खूप खास होती. मालिकेच्या सुरुवातीचे अनेक महत्त्वाचे प्रसंग आम्ही याच परिसरात चित्रित केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा त्या ठिकाणी जाणे म्हणजे अनेक सुंदर आठवणींना उजाळा देण्यासारखे होते. कृष्णा नदीचा शांत प्रवाह, निसर्गरम्य वातावरण आणि गावकऱ्यांनी दिलेले प्रेम यामुळे हा अनुभव अधिक संस्मरणीय झाला. प्रेक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची आणि त्यांचा उत्साह अनुभवण्याची संधी मिळाली. मालिकेला मिळणारे हे प्रेम पाहून आम्ही भारावून गेलो असून, ‘कृष्णाईच्या लेकी’ प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल, याची आम्हाला खात्री आहे.”
प्रत्येक जीवाच्या प्रारब्धाची बदलते दिशा! ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये सुरू झाला ‘ब्रह्मांडनायक’ अध्याय