(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन सुरू होऊन आता जवळपास एक महिना पूर्ण झाला आहे आणि या काळात घरातील समीकरणांमध्ये मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. पहिल्या आठवड्यात ज्या स्पर्धकांमध्ये मैत्री, समज आणि घट्ट नाते दिसत होते, ती नाती आता हळूहळू तुटताना आणि बदलताना दिसत आहेत. प्रत्येक आठवड्यासोबत घरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण होत चाललेलं दिसून येत असून, प्रेक्षकांना येणाऱ्या भाऊच्या धक्क्याची आतुरता लागून राहिलेली असते.
वीकेंड का वारमध्ये रितेश देशमुख आपल्या ‘भाऊचा धक्का’ या खास सेगमेंटद्वारे घरातील स्पर्धकांची चांगलीच शाळा घेताना दिसतो. संपूर्ण आठवडाभरात झालेल्या वाद, गैरसमज आणि नियमभंगावर अभिनेता थेट आणि स्पष्ट शब्दांत भाष्य करताना दिसतो. याच आठवड्यात एक मोठा धक्का बसला तो म्हणजे दिव्या शिंदे हिचे अनपेक्षित एलिमिनेशन झाले. घरातील काही स्पर्धकांना जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या गंभीर आरोपांमुळे बिग बॉसने तिला तात्काळ घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे घरातील सदस्यांनाच नव्हे तर प्रेक्षकांनाही धक्का बसला आहे.
मात्र, हे चकीत करणारे धक्के इथेच थांबले नाही. काल नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये रितेश देशमुखने आणखी एक स्पर्धक घरातून बाद होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे याच आठवड्यात दोन स्पर्धक घराबाहेर पडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आणि ‘आता पुढचा नंबर कुणाचा असेल?’ यावर सगळ्यांचे लक्ष वेधून राहिले आहे.
सोशल मीडियावर आणि प्रेक्षकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार, या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून ओमकार राऊतचा प्रवास संपणार असल्याचे सांगितले जात आहे. मॉडेल असलेल्या ओमकारने सुरुवातीला आपल्या शांत स्वभावाने आणि सौम्य वागणुकीने घरातील अनेक स्पर्धकांची मने जिंकली होती. मात्र, जसजसे दिवस पुढे सरकले, तसतसा त्याच्या खेळात फारसा बदल झालेला दिसून येत नाही आहे, टास्कमध्ये कमी सहभाग घेत असल्याचे त्यावर आरोप देखील होऊ लागले.
या आठवड्यात ओमकारचा रोशनसोबत मोठा वाद झाला होता. याआधीही विशालसोबत त्याचे खटके उडाले आहेत. अनेकदा तो केवळ टास्कच्या वेळीच आपली ताकद दाखवतो आणि इतर वेळी तो मागे असतो असे सदस्यांचे म्हणणे आहे. या सगळ्या कारणांमुळे आणि प्रेक्षकांच्या मतांच्या आधारावर ओमकारला अखेर घराबाहेर पडावे लागल्याची चर्चा आहे.
दरम्यान, कालच्या ‘भाऊचा धक्का’ एपिसोडमध्ये इतरही अनेक मुद्द्यांवर रितेश देशमुखने स्पर्धकांची कानउघडणी केली. तन्वी कोलतेचा एक व्हिडिओ दाखवत तिच्या सामान चोरीच्या प्रकरणाची पोलखोल करण्यात आली. यावरून तिला चांगलेच सुनावण्यात आले. त्याचप्रमाणे रुचिता जामदारने आठवडाभर घातलेल्या गोंधळावरून रितेशने तिला कठोर शब्दांत समज दिली. यावेळी दीपाली सय्यदालाही रितेशच्या रागाला सामोरे जावे लागले. आता येणाऱ्या नव्या आठवड्यात ‘भाऊचा धक्का’मध्ये कानउघडणी झालेल्या स्पर्धकांच्या वागण्यात बदल होतो की ते पुन्हा त्याच चुका करतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.






