नवी दिल्ली : दिल्ली अबकारी धोरण घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सातव्यांदा ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. यानुसार, केजरीवाल यांना सोमवारी (दि. 26) हजर राहण्यास सांगण्यात आले. आम आदमी पार्टीने स्पष्ट केले आहे की, ‘ईडी’च्या समन्सच्या वैधतेचे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे. समन्सबाबत ‘ईडी’ ही न्यायालयात गेली आहे. यापूर्वीही ईडीने सहा समन्स पाठवले होते, त्याकडेही केजरीवालांनी दुर्लक्ष केले होते.
दिल्लीतील अबकारी धोरण घोटाळ्यातील मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर राव यांच्या कन्या के. कविता यांच्याही अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने त्यांनाही समन्स बजावले असून, 20 मार्च रोजी जबाब नोंदविण्यास सांगितले आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याचा दाखला देत त्या ईडीसमोर हजर झाल्या नव्हत्या. या याचिकेत त्यांनी ईडीच्या समन्सला आव्हान दिले असून, अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
चंदीगड विजयाचा बदला घेतंय भाजप
कायदेशीर प्रक्रिया किंवा तपास नसल्याने ईडी वारंवार समन्स पाठवत आहे. आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांना धमकावण्याचा हा एक प्रकार आहे. चंदीगड महापौर निवडणुकीवर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यापासून ईडी समन्स बजावणार असल्याच्या आणि सीबीआय अटक करणार असल्याचे समजले आहे. कारण भाजपला चंदीगडमधील आपच्या विजयाचा बदला घ्यायचा आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने येथे लोकशाही प्रस्थापित केली आहे.
– आतिशी मार्लेना, मंत्री.






