बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे (फोटो - सोशल मीडिया)
Bihar Election Phase One Voting : बिहार : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज (दि.06) पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये १३१४ उमेदवारांचे भवितव्य ठरवले जाणार आहे. देशामध्ये वोट चोरीचा मुद्दा गाजलेला असताना बिहारमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम होत आहे. बोगस मतदार, दुबार मतदार आणि मतदार याद्यांमधील प्रचंड घोळ यामुळे विरोधी कॉंग्रेस (Congress) पक्ष आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर बिहारमध्ये (Bihar) होत असलेल्या निवडणुकीमध्ये काय होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
१८ जिल्ह्यांमधील १२१ विधानसभा जागांसाठी ३.७५ कोटींहून अधिक मतदार मतदान करतील आणि एकूण १,३१४ उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. एनडीए (भाजप-जेडीयू) आणि महाआघाडी (राजद-काँग्रेस-डावी) यांच्यात चुरशीची लढत आहे, तर प्रशांत किशोर यांचा जनसूरज पक्ष तिसरा पर्याय म्हणून उदयास आला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या टप्प्यात, विरोधी “इंडिया” आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा तसेच १६ मंत्र्यांचे भवितव्य पणाला लागले आहे. तेजस्वी यांचे मोठे बंधू आणि जनशक्ती जनता दलाचे संस्थापक तेजप्रताप यादव महुआ मतदारसंघात बहुकोनी लढतीत आहेत. तेजप्रताप राजद आमदार मुकेश रोशन यांना आव्हान देत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) घटक पक्ष लोक जनशक्ती पक्षाचे (राम विलास) संजय सिंह आणि २०२० मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या आस्मा परवीन हे स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत, ज्यामुळे ही स्पर्धा अधिक चुरशीची बनली आहे.
बिहार निवडणुकीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
राहुल गांधी आणि तेजस्वी यादवांकडून सहानुभूतीचे राजकारण
मतदान केल्यानंतर, बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लखीसराय मतदारसंघातील भाजप उमेदवार विजय कुमार सिन्हा यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, “आम्हीही लोकशाहीच्या भव्य उत्सवात सहभागी झालो आहोत. आमच्या मतांनी आम्ही देशाचा पंतप्रधान आणि बिहारचा मुख्यमंत्री निवडतो… बिहारींना अभिमान वाटेल आणि आज बिहार बिहारींवर अत्याचार करणाऱ्या आणि अराजकता, जंगलराज आणि गुंडगिरी आणणाऱ्यांपासून मुक्त होईल. आमचे नेते, पंतप्रधान, गृहमंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री, या सर्वांनी म्हटले आहे की आपण सार्वजनिक श्रद्धेचा भव्य उत्सव साजरा करत असताना, प्रत्येकाने सामाजिक सौहार्दाने लोकशाहीच्या भव्य उत्सवात सहभागी व्हावे… राहुल गांधी आणि तेजस्वी यादव दोघेही सहानुभूतीचे राजकारण करत आहेत. त्यांच्याकडे स्वतःची ओळख नाही. ते त्यांचे राजकारण त्यांच्या पालकांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कामांवर अवलंबून आहे.” अशी टीका त्यांनी केली.






