श्रीनगर : देशातील सर्वांत लांब मालवाहतुकीसाठीचा बोगद्याला आज हिरवा झेंडा दाखवण्यात आला. उधमपूर-श्रीनगर- बारामुल्ला रेल लिंकचा भाग असलेल्या या बोगद्यातून काश्मीर खोऱ्यातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे गाडी धावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बोगद्याचे उद्घाटन पार पडले. पंतप्रधानांनी एकाच वेळी विजेवर दोन धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखविला. टी 50 टनेल सर्वांचे आकर्षण ठरला आहे.
‘टी-५०’ या नावाने लोकप्रिय होत असलेल्या या बोगद्याची लांबी 12.77 किलोमीटर आहे. हा बोगदा खरी- सुंबेर सेक्शनचाच भाग आहे. या बोगद्यातून गेलेली एक गाडी ही श्रीनगर ते सांगल्दान आणि दुसरी सांगल्दान ते श्रीनगर दरम्यान प्रवास केल्य़ाची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. पंतप्रधानांच्या हस्ते 48.1 किलोमीटर लांबीच्या बनिहाल- खेरी- सुंबेर- सांगल्दान या विभागाचेही उद्घा टनही करण्यात आले. उत्तर रेल्वेने दिलेल्या माहितीप्रमाणे आता बारामुल्ला ते सांगल्दानदरम्यान रेल्वे धावू शकेल. ही गाडी बनिहाल मार्गे धावणार आहे.
बनिहाल- खेरी- सुंबेर- सांगदाल विभागामध्ये अकरा बोगद्यांची उभारणी करण्यात आली असून देशाच्या प्रगतीसाठी हे काम महत्त्वाचे ठरणार आहे. यामधील ‘टी-50’ या बोगद्याच्या निर्मितीचे काम खूप आव्हानात्मक होते. या बोगद्याचे काम हे साधारणपणे 20010 मध्ये सुरू झाले त्यानंतर चौदा वर्षांच्या अथक कामांनंतर हा बोगदा पूर्ण झाला. यामध्ये आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सुरक्षाविषयक उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. ‘टी-५०’ या मुख्य बोगद्यालाच समांतर असा एक बोगदा तयार करण्यात आला असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांना त्यातून स्वतःची सुटका करून घेता येईल. त्याचप्रमाणे जर आग लागली तर ती विझविता यावी म्हणून दोन्ही बाजूला पाण्याचे पाइप बसविण्यात आले आहेत. या पाईपला ३७५ मीटरच्या अंतराने वेगळ्या व्हॉल्वची सोय करण्यात आली असून त्यातून आगीवर पाण्याच्या फवाऱ्याचा मारा करण्यात येईल.






