मुंबई : कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता एसटी महामंडळाने जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा बंद केली होती. परंतु शासनाच्या या निर्णयाने अनेक चाकरमान्यांचे हाल होत होते. यावर तोडगा म्हणून तसेच गणेशोस्तवानिमित्त राज्यातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता उद्या २० ऑगस्टपासून राज्यात एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यात येणार आहे. याकरिता ई पासची आवश्यकता नाही. त्यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे राज्यातील एसटीची धाव २३ मार्चपासून बंद ठेवण्यात आली आहे. २२ मे पासून राज्यातील रेड आणि कंटेनमेंट झोन वगळता जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरु करण्यात आली. परंतु त्याकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. मिशन बिगेन अगेन अंतर्गत अनेक सवलती दिल्या जात आहेत.
त्यानुसार राज्यातील एसटीची वाहतूक सुरु करण्याची मागणी जोर धरत होती. नागरिकांना ग्रामीण भागात प्रवासासाठी प्रवासाचे प्रमुख साधन एसटी आहे. एसटीच बंद आसल्याने प्रवाशांना खासगी गाड्यांवर आवलंबून रहावे लागते. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भु्र्दंड देखील सहन करावा लागतो. तसेच राज्यात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाचा सण साजरा करण्यात येतो.
पुनश्च:हरिओम….
एसटीची आंतरजिल्हा बस सेवा 20 ऑगस्ट 2020 पासून सुरू होत आहे. यामध्ये साधी,निमआराम, शिवशाही, शिवनेरी या बस सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होतील. एसटी प्रवासाला ई-पास ची गरज नाही.— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) August 19, 2020
गणेशोत्सवासाठी नागरिकांना प्रवास करता यावा याकरिता देखील एसटीची वाहतूक सुरु करण्याची मागणी आहे. त्यानुसार राज्य सरकारने एसटी महामंडळाला आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यास परवानगी दिली आहे. परंतु ही वाहतूक अंशत: असल्याचे समजते. तसेच टप्प्याटप्प्याने ही वाहतूक वाढविण्यात येणार आहे.