बार्शी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंद आवाहनास प्रतिसाद देत भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, आयटक ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने सोमवारी पोस्ट चौक येथे रस्ता रोको कॉम्रेड प्रविण मस्तुद यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.
शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे तात्काळ रद्द करा, स्वामीनाथन आयोग, 2019 – 20 चा पिक विमा, 2019 चा दुष्काळ निधी, पिक कर्ज, परदेशी सोयाबीनचे आयात बंद करून 2021 च्या अतिवृष्टीचे नुकसान भरपाई द्या, शेतीस दिवसा वीजपुरवठा व्हावा, घरेलू कामगार बांधकाम कामगार यांच्या मागण्या पूर्ण करा, कोरोना काळात वीजबिल माफ करा, सात हजार रुपये सर्व कष्टकरी वर्गाला पेन्शन, 21 हजार रुपये सर्व कष्टकरी वर्गाला किमान वेतन करा, आधारभूत किमत मिळण्याचा शेतकऱ्यांना अधिकार द्या, कोविड काळातील शैक्षणिक फी माफ करा, पेट्रोल डीझेल दरवाढ रद्द करा, सार्वजनिक उद्योगांची कवडीमोल विक्री बंद करा या मागण्या पंतप्रधान यांना दिलेल्या निवेदनामध्ये करण्यात आले आहेत. हे निवेदन नायब तहसीलदार संजीवन मुंढे यांनी स्विकारले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. आयटकचे कॉम्रेड ए.बी.कुलकर्णी, अखिल भारतीय किसान सभेचे कॉम्रेड लहू आगलावे, भारत भोसले, उंबरे अण्णा, लक्ष्मण घाडगे, सरिता कुलकर्णी, अनिरुद्ध नखाते, शौकत शेख, आनंद गुरव, शुभम शिंदे, बालाजी शितोळे, आनंद धोत्रे, भारत पवार, भारत चव्हाण, नागजी सोनवणे, सोमनाथ चव्हाण आदी उपस्थित होते.
संयुक्त किसान मोर्चाच्या भारत बंद आवाहनास बार्शी शहरात मात्र कुठेही प्रतिसाद मिळाला नाही. सोमवार पेठ, लोखंड गल्ली, कापड बाजार, सराफ कट्टासह सर्वत्र व्यवहार सुरळीत होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता.






