मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नवीन नियमानुसार विद्यापीठीय नियुक्तीमध्ये पीएचडी बंधनकारक करण्यात आले आहे. त्यातच विद्यापीठाने दोन वर्षांने पेटची परीक्षा घेतल्याने यंदा पीएचडी प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. मात्र विद्यापीठाचे विविध विभाग, पीएचडी केंद्रामधील गाईडनिहाय रिक्त जागांची माहितीच विद्यापीठाकडून उपलब्ध करण्यात येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडत आहे. यामुळे त्यांना प्रवेश घेण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी अनेक विद्यार्थी ओळखीच्या माध्यमातून गाईड मिळण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुंबई विद्यापीठाने यंदा दोन वर्षांनंतर पीएचडी प्रवेशासाठी आवश्यक असलेली पेट परीक्षा घेतली. या परीक्षेला 7 हजार 706 विद्यार्थी बसले होते. यातील 4 हजार 304 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी विद्यापीठाने स्वतंत्र संकेतस्थळ तयार केले आहे. मात्र या संकेतस्थळावर विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये तसेच विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात असलेल्या पीएचडी केंद्रावर कोणत्या विषयाच्या व कोणत्या गाईडकडे किती जागा आहेत, याची माहितीच प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. यूजीसीच्या नवीन नियमानुसार विद्यापीठीय नियुक्तीमध्ये पीएचडी बंधनकारक केले आहे. त्यामुळे विद्यापीठामध्ये लेक्चरर, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक म्हणून रुजू होण्यासाठी पीएचडी आवश्यक झाली आहे.
परिणामी पीएचडी करण्याकडे ओघ वाढला आहे. मात्र पीएचडी करणार्या विद्यार्थ्यांना पीएचडीच्या विषयाच्या गाईडकडे असलेल्या रिक्त जागांबाबत माहितीच मिळत नाही. तसेच विभाग किंवा पीएचडी केंद्रांकडे याबाबत विद्यार्थ्यांकडून विचारणा केल्यावरही त्यांना कोणतेही उत्तर मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यापीठातील विविध विभाग आणि पीएचडी केंद्रातील प्रवेशाची तारीख वेगवेगळी असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत.
विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी विषयानुरुप योग्य गाईड न मिळाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. हे नुकसान टाळण्यासाठी अनेक विद्यार्थी हे ओळखीचा वापर करून गाईड मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना जागांची माहिती उपलब्ध करून देण्याच्या सूचना विद्यापीठाने सर्व महाविद्यालये, संस्था, सेंटर आणि विद्यापीठातील विभागांना देण्यात याव्यात. तसेच पीएचडीची प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण करण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आणि कोविडच्या नियमांचे पालन करून आंदोलन करण्याचा इशारा आंबेडकर स्टूडंट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप रणदिवे यांनी दिला आहे.
विद्यापीठांशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमधील पीएचडी केंद्रांमध्ये विविध आरक्षणांतर्गत असणार्या जागांची माहितीही दिली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रावरील उपलब्ध जागेची माहितीही मिळण्यात अडचणी येत आहेत. केंद्रावरील आरक्षणाच्या घोळामुळे अनेक विद्यार्थी आरक्षणापासून वंचित राहत आहेत.
पीएचडीसाठी प्रत्येक डिपार्टमेंटची वेगवेगळी फी स्ट्रक्चर आहे. सोशल सायन्स, ह्युमॅनिटी अॅण्ड प्युअर सायन्स यासारख्या विषयांसाठी विद्यापीठाचे विविध विभाग आणि पीएचडी केंद्रांकडून आकारण्यात येणार्या शुल्कामध्ये एकसमानता नाही. याचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.
[read_also content=”दहावी पाठोपाठ बारावीच्या परक्षाही रद्द होणार? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड निर्णय जाहीर करणार https://www.navarashtra.com/latest-news/twelfth-exam-will-be-canceled-after-10th-education-minister-varsha-gaikwad-will-announce-the-decision-nrvk-137001.html”]






