पावसाळा सुरू होताच भारतातील अनेक पर्यटनस्थळांचे सुंदर रुप खुलून येते. हिरवेगार डोंगर, कोसळणारे धबधबे, ढगांनी वेढलेल्या दऱ्या आणि आल्हाददायक वातावरणामुळे या ऋतूत फिरण्याची मजाच काही वेगळी असते. मात्र, काही लोकप्रिय ठिकाणी किंवा स्पॉट्सवर प्रचंड गर्दी असल्याने प्रवासाचा आनंद कमी होतो. अशावेळी निसर्गाच्या अधिक जवळ असलेली, कमी गर्दीची आणि तुलनेने कमी परिचित पर्यटनस्थळे उत्तम पर्याय ठरू शकतात. शांतता, नैसर्गिक सौंदर्य आणि वेगळा प्रवास अनुभवायचा असेल, तर मान्सूनमध्ये भारतातील ही ऑफबीट ठिकाणे तुमच्या ‘ट्रॅव्हल बकेट लिस्ट’मध्ये नक्की असावीत.
हिरव्यागार भातशेती, धुक्याने झाकलेले डोंगर आणि प्रसन्न वातावरणासाठी झिरो व्हॅली प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात येथील निसर्ग अधिक खुलून दिसतो. शांत वातावरणामुळे निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीची आवड असलेल्या पर्यटकांसाठी हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र ठरते.
‘दक्षिण भारतातील चेरापुंजी’ म्हणून ओळखले जाणारे अगुंबे मुसळधार पाऊस, घनदाट जंगल आणि मनमोहक सूर्यास्तासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात येथील धबधबे आणि निसर्गरम्य दृश्ये पर्यटकांना भुरळ घालतात.
नागमोडी वळणाचे रस्ते, चहाचे मळे आणि ढगांनी वेढलेल्या टेकड्यांमुळे पोनमुडी हे हिल स्टेशन विशेष लोकप्रिय आहे. पावसाळ्यात हे ठिकाण अधिक सुंदर दिसते. कुटुंबीय आणि जोडप्यांसाठी हे एक शांत आणि रमणीय पर्यटनस्थळ मानले जाते.
ऐतिहासिक किल्ले, राजवाडे आणि तलावांनी समृद्ध असलेले मांडू पावसाळ्यात अधिकच आकर्षक दिसते. इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल, तर हे ठिकाण उत्तम पर्याय आहे.






