रक्षाबंधन 2026 (फोटो- सोशल मिडिया)
राखीच्या धाग्यात पर्यावरणाची वीण
पुण्यात ‘इको-फ्रेंडली’ राख्यांना विशेष पसंती
घरच्या घरी राखी तयार करण्याकडेही काही कुटुंबांचा कल
सुनयना सोनवणे / पुणे: भावंडांच्या नात्याची वीण घट्ट करणाऱ्या राखीला यंदा पर्यावरण संवर्धनाची जोड मिळाली आहे. प्लास्टिक, कृत्रिम मणी आणि न विघटनारे साहित्य टाळून कापूस, ज्यूट, कागद, लाकूड, कापड आणि बियाण्यांपासून तयार केलेल्या राख्यांना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. त्यामुळे मनगटावर बांधला जाणारा धागा आता निसर्गाशी नाते जोडण्याचे माध्यम ठरत आहे. शहरातील बाजारपेठांमध्ये पारंपरिक राख्यांसोबत पर्यावरणपूरक राख्यांचे (Raksha Bandhan) विविध प्रकार उपलब्ध आहेत. त्यामध्ये ‘राखी बांधा आणि झाड लावा’ ही संकल्पना विशेष लक्षवेधी ठरत आहे. वापरल्यानंतर राखी मातीत लावल्यास त्यातील बियाण्यांपासून रोप उगवावे, अशी या राख्यांची संकल्पना आहे.
रक्षाबंधनानंतर राख्या आणि त्यांचे प्लास्टिक पॅकेजिंग मोठ्या प्रमाणावर कचऱ्यात जाते. त्यामुळे यंदा कागदी पाकिटे, कापडी पिशव्या आणि पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर केला जात आहे. सजावटीसाठीही प्लास्टिकऐवजी कागद, कापूस, लाकूड आणि नैसर्गिक साहित्याला प्राधान्य दिले जात आहे.
जुन्या कापडाचे तुकडे, लोकर, कागद, धागे आणि मणी यांचा वापर करून घरच्या घरी राखी तयार करण्याकडेही काही कुटुंबांचा कल आहे. मुलांसाठी आयोजित कार्यशाळांमधून सर्जनशीलतेसोबत पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जात आहे.
Raksha Bandhan 2026: सोन्याची वा चांदीची राखी बांंधण्याचे नियम, करू नका ‘ही’ चूक
स्थानिकांना रोजगार
पर्यावरणपूरक राख्यांची निर्मिती महिला बचतगट, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक कारागिरांकडून केली जात आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक उत्पादनांना चालना मिळण्याबरोबरच स्थानिक कौशल्य आणि रोजगारालाही हातभार लागत आहे. विविध कंपन्या आणि संस्थांकडूनही कर्मचाऱ्यांसाठी अशा राख्यांची निवड केली जात असून, त्यासोबत रोप किंवा पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जात आहे.
काय असते ‘इको-फ्रेंडली’ राखी?
– कापूस, ज्यूट, कागद किंवा लाकडाचा वापर
– प्लास्टिक व कृत्रिम सजावट टाळली जाते
– बियाणे असलेल्या राख्या
– मातीत मिसळणारे साहित्य
– कागदी किंवा कापडी पॅकेजिंग
– स्थानिक कारागिरांकडून निर्मिती
‘ग्राहक आता केवळ राखी सुंदर आहे का, एवढाच विचार करत नाहीत; ती कोणत्या साहित्यापासून तयार केली आहे आणि वापरल्यानंतर तिचे काय होणार, याचाही विचार करू लागले आहेत. त्यामुळे नैसर्गिक साहित्यापासून तयार केलेल्या राख्यांना यंदा चांगला प्रतिसाद मिळत आहे.’
– वर्षा गरड, महिला कारागीर व बचतगट प्रतिनिधी
Avoid gifts on Raksha Bandhan: बहिणीसाठी राखीचं गिफ्ट घेताय? ‘या’ ५ वस्तू चुकूनही देऊ नका!
‘राखी बांधल्यानंतर ती कचऱ्यात जाण्यापेक्षा तिच्यापासून एखादे रोप तयार झाले, तर त्यातून भावंडांच्या नात्याची आठवणही जपली जाते आणि निसर्गाशी नातेही जोडले जाते.’
– मिताली वाघमारे, ग्राहक






