'अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकवणार, जाणीवपूर्वक मराठी शिकण्यास नकार दिल्यास..,' परिवहनमंत्री सरनाईकांची मोठी घोषणा
मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सरनाईक यांनी या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी कामगार नेते शशांक राव तसेच कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
रिक्षा-टॅक्सी चालकांकडून या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सरनाईक यांनी सांगितले. महाराष्ट्राची भाषा, अस्मिता आणि संस्कृती यांचा आदर राखण्याची भूमिका अनेक चालकांनी व्यक्त केली आहे.
तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच, पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट…
ज्या चालकांनी अद्याप मराठीचे प्रशिक्षण घेतलेले नाही, त्यांच्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या माध्यमातून कार्यशाळा सुरू ठेवण्यात येणार आहेत. मुंबई, ठाणे, भिवंडी, नालासोपारा, वसई-विरार आणि नवी मुंबई परिसरातील प्रशिक्षण केंद्रांची माहिती संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. या केंद्रांची माहिती मिळण्यासाठी स्वतंत्र संपर्क क्रमांकही लवकरच जाहीर केला जाणार आहे.
चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्याबाबत सरनाईक यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले. सुरुवातीला एक महिन्याची मुदत दिली जाणार असून, आवश्यकता भासल्यास त्यानंतर आणखी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात येईल.
या काळात संबंधित चालकांना मराठी शिकण्याची संधी दिली जाईल. कायद्यानुसार बॅज निलंबित करण्याची कारवाई होऊ शकते; मात्र या तीन महिन्यांच्या मुदतीत बॅज रद्द केला जाणार नसल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
त्यानंतरही एखाद्या चालकाने जाणीवपूर्वक मराठी शिकण्यास नकार दिल्यास संबंधित कायद्यानुसार बॅज रद्द करण्याची कारवाई होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
परिवहन विभागाने हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि समाजसेवेच्या भावनेतून राबविल्याचे सरनाईक यांनी सांगितले. मात्र, विभागाच्या निर्देशांचे उल्लंघन करून कोणी कायद्याच्या कक्षेबाहेर काम करत असल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
ड्रग्ज माफियांवर थेट प्रहार! पोलिसांनी सुरू केली ‘ही’ विशेष धडक मोहीम
मुंबई आणि ठाणे परिसरातील वातावरण बिघडविण्याचा काही समाजकंटकांकडून प्रयत्न होत असल्याचा दावा करत त्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. रिक्षा-टॅक्सी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी शासन सातत्याने चर्चा करत असून, त्यांच्या सूचनांचा विचार करूनच कारवाई केली जाईल, असेही सरनाईक यांनी सांगितले.
दरम्यान, मराठी भाषा विभागाच्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियान’अंतर्गत हा उपक्रम पुढेही सुरू ठेवण्याचे धोरण असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.






