(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
साखरेचा कारखानदारी दर १८ टक्क्यांनी घसरून ५५ रुपये प्रति किलो झाला आहे. गेल्या आठवड्यात हा दर विक्रमी ६७ रुपये प्रति किलोवर पोहोचला होता. अन्न सचिव संजीव चोप्रा म्हणाले की, साखरेच्या दरातील अलीकडील वाढ ही बाजारातील साखरेच्या तुटवड्यामुळे झालेली नाही. सरकारने स्पष्ट केलं की देशात पुरेसा साठ उपलब्ध आहे.
गेल्या आठवड्यात, सरकारने १० लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली. घाऊक खरेदीदारांसाठी साठवणुकीची मर्यादाही कमी करण्यात आली आणि साठेबाजी व सट्टेबाजीवर लक्ष ठेवण्यासाठी तपासणी तीव्र करण्याचे निर्देश राज्यांना देण्यात आले. अन्न सचिवांच्या मते, काही कारखान्यांनी दर वाढवले होते, परंतु आता कारखान्यातील दर वेगाने कमी होत आहेत. साठेबाजीला आळा घालण्यासाठी देशभरात भरारी पथकेही तैनात करण्यात आली आहेत.
नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजच्या मते, सध्या कोणत्याही राज्यात साखरेचा कारखान्यातील दर ५५ रुपये प्रति किलोपेक्षा जास्त नाही आणि येत्या काही दिवसांत त्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
कारखान्यातील दरातील घसरणीचा पूर्ण फायदा अद्याप सामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचलेला नाही. २४ ऑगस्ट रोजी, देशात साखरेचा सरासरी घाऊक दर ५८.२९ रुपये प्रति किलो आणि किरकोळ दर ६३.०५ रुपये प्रति किलो होता. याचा अर्थ असा की, कारखान्याच्या पातळीवर साखर स्वस्त होऊ लागली आहे, परंतु याचा परिणाम दुकानांवर होण्यासाठी काही वेळ लागू शकतो. साधारणपणे, कारखान्यातील आणि किरकोळ दरांमध्ये प्रति किलो सुमारे ७-८ रुपयांचा फरक असतो.






