खांद्यावर पंप, हातात शेतीची धुरा! कराडच्या रणरागिणी महिला गटाची सेंद्रिय शेतीत दमदार वाटचाल
रणरागिणी महिला गटाच्या अध्यक्षा सुषमा पोळ यांच्या नेतृत्वाखाली १६ महिलांनी एकत्र येत गटशेती सुरू केली आहे. यंदा सुमारे १६ एकर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्यात आले आहे. नियोजनाने महिला स्वतः शेतात उतरल्या आहेत. खांद्यावर पंप घेऊन सोयाबीनवर दशपर्णी अर्काची फवारणी सुरू आहे. पिक सेंद्रिय पद्धतीने घेत असताना उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आनंदाची बातमी! नांदेड जिल्ह्यातील 13 हजार शेतकरी कर्जमुक्त; तब्बल 106 कोटी…
सैदापूर कृषी मंडळामार्फत शेतीशाळांचे आयोजन करून महिलांना मार्गदर्शन केले जात आहे. कृषी सहाय्यक पी. एम. मोहिते, शंकर जगदाळे, हणमंत चव्हाण, कृषी सखी शिला डांगे, कृषी मित्र धनाजी जाधव यांचा यामध्ये सहभाग आहे. गटातील सदस्यांच्या शेतातील माती परीक्षण करण्यात आले असून, त्यानुसार खत व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात येणार आहे.
या महिला शेतकरी स्वतः कोळपणी करून तण नियंत्रण करीत आहेत. सोयाबीनवरील विविध किडींच्या नियंत्रणासाठी सापळेही लावत आहेत. पेरणीपासून भांगलणी, कोळपणी, कीड नियंत्रण, काढणी व मळणीपर्यंतची कामे सामूहिक पद्धतीने करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. नियोजनाने मजुरी खर्च व वेळेची बचत होऊन उत्पादनवाढीस मदत होणार आहे.
“पेरणीपूर्व मशागत, बीज प्रक्रिया, योग्य पेरणीतील अंतर, तण व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, काढणी-मळणीच्या आधुनिक पद्धती याबाबत शेतीशाळांमधून मार्गदर्शन करण्यात आले आहे. सध्या कोळपणी, फवारणी, किडींसाठी सापळे लावण्याचे काम सुरू आहे.” अशी माहिती सैदापूर मंडळ कृषी सहाय्यक, पी. एम. मोहिते यांनी दिली.
“सामूहिक पद्धतीने केलेली शेती अधिक फायदेशीर ठरते. आम्ही महिला गटशेती करत असून खरीप पीक स्पर्धेत सहभागी झालो आहोत. स्वतः शेतात काम करून सेंद्रिय पद्धतीने सोयाबीनचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न आहे. सध्या दशपर्णी अर्काची फवारणी व किड नियंत्रणासाठी सापळे लावण्याचे काम सुरू आहे.” तसेच शिला डांगे, कृषी सखी, कृषी विभाग, पाणी फाउंडेशन व उमेद अंतर्गत रणरागिणी महिला गट, शामगाव दिली.






