
अहिल्यानगरमध्ये रक्ताचा तीव्र तुटवडा; उष्णतेची लाट आणि सुट्ट्यांमुळे रक्तपेढ्या रिकाम्या
अहिल्यानगरच्या जनकल्याण रक्तपेढीमध्ये दरमहा सरासरी १००० ते १२०० रक्त पिशव्यांची आवश्यकता असते. यामध्ये अपघातातील रुग्ण, शस्त्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांच्या रुग्णांचा समावेश असतो. मात्र, सध्याच्या परिस्थितीत रक्तपेढीत प्रत्येक रक्तगटाच्या केवळ दोन-दोन पिशव्या शिल्लक आहेत. रक्ताचा हा साठा अत्यंत कमी असल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांचे प्राण वाचवणे कठीण होऊ शकते.
रक्ताच्या या तुटवड्याचा सर्वाधिक फटका थायलसेमियाच्या रुग्णांना बसत आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना जिवंत राहण्यासाठी नियमित रक्ताची गरज असते. जनकल्याण रक्तपेढीला दरमहा थायलसेमियाच्या रुग्णांसाठी किमान १५० रक्त पिशव्यांची गरज लागते. रक्ताचा साठा उपलब्ध नसल्यामुळे या रुग्णांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
उन्हाची तीव्रता: वाढत्या उष्णतेमुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत, परिणामी रक्तदान शिबिरांना प्रतिसाद मिळत नाहीये.
शाळा-कॉलेजला सुट्ट्या: अनेक रक्तदान शिबिरे ही महाविद्यालयीन तरुणांच्या पुढाकाराने होतात, मात्र सध्या सुट्ट्या असल्यामुळे ही शिबिरे बंद आहेत.
लग्नसराई: लग्नसराईच्या गडबडीमुळे सामाजिक संस्थांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरांचे प्रमाण घटले आहे.
“सध्या रक्तपेढीमध्ये रक्ताचा साठा अत्यंत कमी झाला आहे. प्रत्येक रक्तगटाच्या केवळ दोनच पिशव्या शिल्लक आहेत. उन्हाळा, सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे शिबिरे होत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची गरज लक्षात घेता नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन रक्तदान करावे”, अशी माहिती जनकल्याण रक्तपेढीचे व्यवस्थापक सागर उंडे यांनी दिली.
तसेच जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी या संकटकाळात माणुसकीच्या नात्याने रक्तदान करून रुग्णांना जीवदान द्यावे.