Photo Credit : Social media
अहमदनगर: लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नगर उत्तर दक्षिण मतदारसंघात हायव्होल्टेज लढत पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाकडून निलेश लंकेंनी खासदारकीची तिकीट मिळवलं त्यांच्यासमोर आव्हान होतं ते भाजपच्या सुजय विखे यांचे. पण लंकेंनी लढण्याची जिद्दीन लढत दिली आणि लोकसभा निवडणुकीत विजयही मिळवला.
पण सुजय विखेंना हा पराभव अजूनही मान्य नसल्याचे दिसत आहे. नगर उत्तर दक्षिण मतदारसंघातच्या निकालावर आक्षेप घेत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर मंगळवारी (ता.6) सुनावणी पार पडली.
सुजय विखेंनी जिल्हाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत निलेश लंके निवडून आल्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी केली आहे. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निलेश लंके यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिल्याने निलेश लंकेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सुजय विखेंनी खासदार लंकेविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने लंकेंसमोर लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर आता कायदेशीर लढाई जिंकण्याचंही आव्हान निर्माण झालं आहे. हे आव्हान निलेश लंके कसे पार करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंचा 28 हजार मतांन पराभव करत निलेश लंके जायंट किलर ठरले होते. त्यानंतरही लोकसभेत इंग्रजी भाषेत शपथ घेऊन निलेश लंकेंनी सुजय विखेंच्या टीकेला अप्रत्यक्षत्ररित्या चपराकच दिली. पण लोकसभा निवडणुकीतील पराभव विखे पाटलांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे त्यांनी निलेश लंकेंविरोधात कायदेशीर लढाईचे आव्हान उभे करत न्यायालयात धाव घेतली आहे.
या याचिकेवर आता 2 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. पण उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निलेश लंकेंना नोटीस बजावण्याचे आदेश दिल्यामुळे लंकेंचं टेन्शन वाढलं आहे. या याचिकेतून विखेंनी निलेश लंकेंवर गंभीर आरोप केले आहेत. नगरमधील लढतीत 40 ते 45 केंद्रांवरील मतमोजणी योग्य पद्धतीने करण्यात आली नसल्याचा आरोप विखेंनी या याचिकेत केला आहे.