वीज केंद्राचे काम रखडल्याने शेतकरी त्रस्त; वर्षभरापासून काम थंड, पिके वाचवण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान
अकोला : बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजरनजीकच्या मौजे जमकेश्वर येथे महावितरणच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या ३३/११ केव्ही वीज उपकेंद्राचे काम वर्षभरापासून संथगतीने सुरू असून, अद्यापही अपूर्ण आहे. कंत्राटदाराने सप्टेंबरअखेर काम पूर्ण करण्याचे नियोजन केले होते. मात्र, निर्धारित कालावधी संपत आला तरी काम पूर्ण न झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
हे उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर जमकेश्वर, धाकली, सावरखेड, टिटवा, निहीदा, बहिरखेड, उमरदरी व पिंपळगाव हांडे या गावांना सुरळीत वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार असून, कृषिपंपांचा प्रश्नही मार्गी लागण्याची अपेक्षा आहे. सध्या पावसाने ओढ दिल्याने पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठ्याची नितांत गरज आहे. मात्र, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि सततच्या तांत्रिक बिघाडांमुळे शेतीचे नुकसान होत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
सबस्टेशनचे काम रखडल्याने परिसरातील गावांमध्ये विजेची समस्या भेडसावत आहे. उपकेंद्र लवकर कार्यान्वित झाल्यास कृषिपंपांचा मोठा प्रश्न सुटण्यास मदत होईल. त्यामुळे प्रशासनाने काम गतीने पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी माजी सरपंच प्रदीप देशमुख यांनी केली.
दरम्यान, सप्टेंबरअखेर काम पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र ते अद्याप अर्धवट आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय ठाकरे यांनीही केली.
जुन्या यंत्रणेवर वीज वितरणाचा भार
उपकेंद्राचे काम रखडल्याने परिसरातील वीज वितरणाचा भार जुन्या यंत्रणेवर पडत आहे. त्यामुळे वारंवार रोहित्र जळण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन बांधकामाच्या दर्जाची पाहणी करावी आणि कंत्राटदाराला सूचना देऊन उर्वरित काम तातडीने पूर्ण करून प्यावे, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.






