Farmers Issue : शेतकऱ्यांचे 5 महिन्यांचे अनुदान रखडलेलेच; APL कार्डधारक त्रस्त (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अकोला : जिल्ह्यातील एपीएल रेशन कार्डधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात मिळणाऱ्या धान्याऐवजी भेट रोख रक्कम हस्तांतरण (DCT) योजनेअंतर्गत २०२३ पासून प्रति लाभार्थी दरमहा १७० रुपये देण्यात येत आहेत. मार्चपर्यंत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना २ कोटी ३३ लाख १३ हजार ५३५ रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. मात्र, त्यानंतर शासनाकडून निधी प्राप्त न झाल्याने गेल्या ५ महिन्यांपासून लाभार्थी या रकमेच्या प्रतीक्षेत आहेत.
राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर १४ दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश करण्यात आला होता. या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबांना प्रतिकिलो तीन रुपये दराने तांदूळ आणि दोन रुपये दराने गहू देण्यात येत होता. एका कुटुंबाला दरमहा जास्तीत जास्त २५ किलो धान्य देण्याची तरतूद होती. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. त्यानंतर धान्याऐवजी प्रति लाभार्थी दरमहा १७० रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याची डीबीटी योजना सुरू करण्यात आली.
मोठी बातमी ! मनोज जरांगेंनी अखेर 20 दिवसानंतर उपोषण घेतले मागे; राज्य सरकारला दिली 3 महिन्यांची मुदत
सध्या या योजनेचा लाभ शेतकरी कार्डधारकांना दिला जात आहे. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून निधी मिळालेला नसल्याने लाभाथ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यातच पावसाअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने रखडलेला डीबीटीचा निधी तातडीने वितरित करावा, अशी मागणी लाभार्थी शेतकऱ्यांकडून होत आहे.
प्रति लाभार्थी शासनाकडून मिळतात १७० रुपये
एपीएल केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना धान्याऐवजी डीबीटीद्वारे प्रति लाभार्थी १७० रुपये रक्कम शासनाकडून मिळते. मार्चपर्यंत रक्कम देण्यात आली असून, आणखी दहा कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे.
– रवींद्र येन्नावार, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला






