मंत्री आशिष शेलार (फोटो - ट्विटर)
नागरिकांनी इंटरनेटचा सुरक्षित वापर करण्याचे आवाहन
मंत्रालयात साजरा झाला ‘सेफर इंटरनेट डे’
इंटरनेट आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक
मुंबई: नागरिकांनी डिजिटल व्यसनापासून दूर राहून, इंटरनेटचा जबाबदारीने आणि सुरक्षित वापर करावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य , माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले. शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे मंत्रालयात आयोजित ‘सेफर इंटरनेट डे’ कार्यक्रमात ते बोलत होते.
मंत्री ॲड. शेलार म्हणाले की, इंटरनेट आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. मात्र, त्याचा अतिरेक टाळून तो मर्यादित आणि सुजाणपणे वापरणे आवश्यक आहे. भारताच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात देखील डिजिटल व्यसनाधीनतेचा धोका अधोरेखित करण्यात आला असून, त्यामुळे व्यक्तीची उत्पादकता आणि निर्णयक्षमता कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
युवकांमध्ये डिजिटल व्यसन वाढल्यास, त्याचा थेट परिणाम देशाच्या प्रगतीवर होऊ शकतो. इंटरनेट वापराचे प्रमाण, त्याची मर्यादा, सुरक्षितता, नैतिकता आणि जबाबदारी या सर्व बाबींवर लक्ष देणे गरजेचे आहे. जसे आपण आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करतो, तसेच आता इंटरनेट वापरासंबंधी ‘सेफ इंटरनेट चेकअप’ करणे काळाची गरज आहे.
‘सेफर इंटरनेट डे’च्या निमित्ताने समाजातील प्रत्येक घटकाने या बाबतीत सजग राहून, सुरक्षित आणि जबाबदार डिजिटल नागरिकत्व जोपासावे, असेही मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे डिजिटल सुरक्षेविषयी अत्यंत जागरूक असून, महाराष्ट्र राज्य या क्षेत्रात देशातील इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
On ‘Safer Internet Day’, addressed a special session at Mantralaya, urging officers and staff across departments to strengthen cyber awareness, data protection and responsible digital governance as Maharashtra advances towards a secure digital future. Chief Secretary Rajesh… pic.twitter.com/xtLsXc6hLV — Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 10, 2026
सायबर सुरक्षिततेबाबत सजग राहा: मुख्य सचिव राजेश अग्रवाल
आपल्या दैनंदिन कामासाठी आपल्याला डिजिटल साधनांचा वापर करणे आवश्यक आहे. मात्र हे करत असताना अधिक सजग राहणे आवश्यक असल्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले. मोबाईलवर नेहमी पिन लॉक ठेवणे, अनावश्यक ठिकाणी फ्री वायफाय नेटवर्कचा वापर टाळावा, ई-ऑफिस दस्तऐवज किंवा पासवर्ड इतरांना देणे टाळावे, गुगलवर मिळणारे फसवे बँक हेल्पलाइन नंबर वापरू नयेत, अधिकृत वेबसाइटवरूनच संपर्क साधावा, अशी सूचनाही मुख्य सचिव अग्रवाल यांनी यावेळी केली.
वेगवेगळ्या डिजिटल प्रणालीचा वापर करताना सोपे पासवर्ड ठेवू नये याऐवजी मोठा आणि व्हिज्युअल पासवर्ड सुरक्षित असतात. तसेच सोशल मीडियावर अति शेअरिंग टाळून शांत जीवन जगा, असे आवाहनही मुख्य सचिव अग्रवाल यांनी केले. स्मार्ट तंत्रज्ञान, सुरक्षित निवड — कृत्रिम बुद्धिमत्तेचा सुरक्षित आणि जबाबदार वापर या विषयावर मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले.






