सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : मनपाच्या निवडणुका येत्या चार-पाच महिन्यात होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. आगामी निवडणुका या महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून लढल्या जाणार की स्वबळाचा याचा ठोस निर्णय अद्याप झालेला नाही. पण कार्यकर्ते, पदाधिकारी कामाला लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी पुण्यात मुक्कामाला होते. पुणे शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी पदाधिकाऱ्यांसह त्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना कामाला लागा, अशा सूचना दिल्या आहेत. महापालिका निवडणुकीची पक्षाने जोरात तयार केली पाहिजे, आपला महापौर मनपात बसला पाहिजे, अशा पद्धतीने कामाला लागा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
“पुणे मनपामध्ये 105 नगरसेवक आहेत, त्या जागा पुन्हा निवडून येणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. कोण किती जागा लढवणार याचा फॉर्म्युला प्रदेश स्तरावर ठरणार आहे. 2017 मध्ये झालेल्या मनपा निवडणुकीत ज्या जागा आम्ही निवडून आलोय त्या सगळ्या लढवणार आहोत, असे घाटे म्हणाले. पुण्यात रविवारी सांयकाळी चार वाजता आम्ही तिरंगा रॅली काढणार असल्याचे घाटे यांनी सांगितले.
स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढाव्यात, अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पुण्यात फॉर्म्युला देखील सांगितला. सरसकट युती न करता ज्या ठिकाणी स्वाभाविक युती होऊ शकते त्या ठिकाणी युती करण्यात येणार असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. पुण्यात महायुती म्हणून निवडणूक लढविणे अशक्य असल्याचे चित्र आहे.
जागावाटप ठरणार कळीचा मुद्दा
जागा वाटप हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही घटक पक्षामध्ये जागा वाटपावरुन रस्सीखेच होईल, हे स्पष्ट आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड मनपामध्ये स्वबळावरच निवडणुका लढवाव्या लागतील, असे दिसते. 2017 च्या महापालिका निवडणुकीत 164 पैकी 99 जागा भाजपने जिंकल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसने 42 जागा जिंकून दुसर्या क्रमांकाचा पक्ष होता.