ड्रग्जविरोधी लढ्याला बळ! ‘कॅम्पस कनेक्ट’चा शुभारंभ; पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेंच्या कामगिरीचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
सावन वैश्य | नवी मुंबई : युवा पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यात जाण्यापासून रोखण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी (Drug Free Navi Mumbai) सुरू केलेल्या ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाला आणखी बळ मिळाले आहे. नवी मुंबई पोलिसांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘कॅम्पस कनेक्ट’ उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डी. वाय. पाटील महाविद्यालयात करण्यात आला. यावेळी नवी मुंबई विमानतळ पोलीस ठाणे, एकात्मिक सीसीटीव्ही कमांड सेंटर तसेच व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचेही उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला वनमंत्री गणेश नाईक, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, आमदार मंदा म्हात्रे, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, प्राचार्य आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाची सुरुवात जानेवारी २०२५ मध्ये करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणानुसार नवी मुंबई पोलिसांनी मागील तीन वर्षांत अंमली पदार्थांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. या कारवाईत २,९१९ आरोपींना अटक करण्यात आली असून १,०२७ किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. जप्त मालाची किंमत सुमारे १४२ कोटी रुपये असल्याची माहिती देण्यात आली.
Murder Case : गुन्हा दाखल केल्याच्या रागातून वृद्धाचा निर्घृण खून; पोलिसांनी आरोपींना घेतले ताब्यात
याशिवाय अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या १,८२२ जणांवर कारवाई, तर ३०० सराईत आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांना अंमली पदार्थांची विक्री अथवा सेवनाबाबत माहिती देता यावी, यासाठी ८८२८ ११२ ११२ हा हेल्पलाइन क्रमांकही सुरू करण्यात आला आहे.
अंमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या पुढाकारातून प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र ‘अँटी नार्कोटिक्स सेल’ स्थापन करण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर अंमली पदार्थांच्या विक्री-वितरणावर लक्ष ठेवून तातडीने कारवाई करण्यास या सेलची मदत होत आहे. नवी मुंबई पोलिसांच्या या प्रयोगाची दखल घेत राज्यातील इतर पोलीस ठाण्यांमध्येही अशा प्रकारचे सेल स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘कॅम्पस कनेक्ट’ उपक्रमाला नवी मुंबईतील जवळपास २५० महाविद्यालयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात विद्यार्थी व पोलीस प्रतिनिधींच्या सहभागातून ‘अँटी-नार्कोटिक्स कमिटी’ स्थापन करण्यात येणार आहे. पोस्टर मेकिंग आणि रील मेकिंग स्पर्धेतील विजेत्यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांनी नशामुक्त जीवन जगण्याची शपथ घेतली. त्यामुळे अंमली पदार्थांविरोधातील लढा केवळ पोलिसांपुरता मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांपर्यंत आणि शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नवी मुंबई पोलीस आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त पुढाकारातून व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात वैद्यकीय तपासणी, मानसोपचार तज्ज्ञांचे मार्गदर्शन, औषधोपचार व समुपदेशनासह १० खाटांची निवासी उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. व्यसनाधीन व्यक्तींचा आत्मविश्वास पुन्हा निर्माण करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यावर भर देण्यात येणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका आणि तळोजा एमआयडीसी क्षेत्रातील ४,०११ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फीड पोलीस आयुक्त कार्यालयातील एकात्मिक सीसीटीव्ही कमांड सेंटरमध्ये पाहता येणार आहे. गुन्हेगारांचा माग काढणे, गुन्ह्यांचा तपास जलद करणे आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हे कमांड सेंटर महत्त्वाचे ठरणार आहे.
अंमली पदार्थांविरोधातील या कठोर आणि प्रभावी लढ्यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक होत आहे. दिवस-रात्र मेहनत घेत नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ पुरवठादारांवर धडक कारवाई करण्यासोबतच समाजात जनजागृती घडवून आणण्यावरही भर दिला आहे.
पोलीस, प्रशासन आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नांतून नवी मुंबई लवकरच पूर्णपणे नशामुक्त होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. ‘कॅम्पस कनेक्ट’, अँटी नार्कोटिक्स सेल, व्यसनमुक्ती केंद्र आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नशामुक्त नवी मुंबईच्या दिशेने पोलिसांनी निर्णायक पाऊल टाकले आहे.
अंमली पदार्थांची विक्री किंवा सेवनाबाबत माहिती असल्यास नागरिकांनी ८८२८ ११२ ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केले आहे.






