
छ. संभाजीनगरकरांची पाणी कोंडी फुटणार! मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण (Photo Credit- X)
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सायफन पद्धतीने जॅकवेलमध्ये पाणी घेऊन योजनेची सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर मुख्य जलवाहिनी, जलशुद्धीकरण केंद्र आणि अन्य यंत्रणांच्या चाचण्या पूर्ण करण्यात आल्या. प्रारंभी दोन दिवस २० एमएलडी पाणी शहराला पुरवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर काही तांत्रिक कामांसाठी कंत्राटदार कंपनीने शटडाऊन घेतल्याने प्रक्रिया थांबली होती. शटडाऊनदरम्यान जायकवाडी धरणातील पाणीपातळी घटल्यामुळे सायफन पद्धतीने पाणी उपसा करण्यास अडथळे निर्माण झाले. ही बाब लक्षात येताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तातडीने पर्यायी उपाययोजना राबविली.
तीन सबमर्सिबल पंपांच्या साहाय्याने पाणी उचलून ते सायफन पाइपजवळ सोडण्यात आले. त्यानंतर व्हॅक्यूम पंपाद्वारे हवेचा दाब निर्माण करून सायफन प्रणाली पुन्हा कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे जॅकवेलमध्ये पाणी घेण्याची प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. पाणी उपसा सुरळीत सुरू असतानाच जायकवाडी वसाहतीजवळील स्मशानभूमी परिसरातील मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह फुटल्याचे निदर्शनास आले.
वाहतूक नियमभंग करणाऱ्यांना दणका दिवसभरात १,१४९ वाहनचालकांवर कारवाई; १३.८४ लाख रुपयांचा दंड वसूल
परिणामी, जॅकवेलपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील जलवाहिनी रिकामी करून दुरुस्तीचे काम हाती घ्यावे लागले. जलवाहिनीतील पाणी पूर्णपणे बाहेर काढण्यासाठीच अनेक तास लागले. त्यानंतर युद्धपातळीवर दुरुस्ती करण्यात आली. तब्बल २४ तासांच्या प्रयत्नांनंतर शनिवारी सायंकाळी काम पूर्ण झाले आणि लगेचच पंपिंग सुरू करण्यात आले.
जॅकवेलमधून सोडण्यात आलेले पाणी मुख्य जलवाहिनीद्वारे नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचणार आहे. तेथे पाण्यावर आवश्यक प्रक्रिया करून ते एमबीआरमध्ये साठवले जाईल. त्यानंतर वितरण व्यवस्थेद्वारे शहरातील विविध भागांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या योजनेच्या मदतीने आणि नव्या योजनेतील उपलब्धतेनुसार पुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
नव्या योजनेतील पाणी सिडको हडको भागापर्यंत पोहोचवण्यासाठी एन-५ परिसरातील जलकुंभांशी जोडणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. एन-२ आणि एन-३ या जलकुंभांना क्रॉस कनेक्शन देण्यात आले असून १५०० मिमी व्यासाच्या पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठ्याचा मार्ग खुला झाला आहे. एक्सप्रेस लाईनवरून शनिवारी रात्रीपासून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. उर्वरित तांत्रिक कामे पुढील दोन दिवसांत पूर्ण होणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.