७० वर्षांवरील ज्येष्ठांना मिळणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! (Photo Credit- X)
जिल्ह्यातील ७० वर्षांवरील सुमारे २ लाख ३१ हजार ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचे लाभ मिळवून देण्यासाठी त्यांचे ई-केवायसी पूर्ण करून कार्ड वितरित करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ज्येष्ठ नागरिक स्वतः संबंधित पोर्टलवर जाऊन किंवा आयुष्मान ऍपद्वारे आपले कार्ड बनवू शकतात. या व्यतिरिक्त, गावोगावी असलेल्या आशा सेविका, रेशन दुकानदार आणि आपले सरकार सेवा केंद्र यांच्या मदतीने हे कार्ड काढता येईल.
कार्ड बनवण्यासाठी लाभार्थ्यांचा आधार क्रमांक आणि आधारशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक (ओटीपीसाठी) आवश्यक आहे. ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून केवळ ५ मिनिटांत कार्ड तयार होते अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली आहे.
जिल्ह्यातील उर्वरित लाभार्थ्यांच्या याद्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सोपवण्यात आल्या असून प्रत्येक कर्मचाऱ्याला दररोज किमान २५ ई-केवायसी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ज्या गावांमध्ये ७० वर्षांवरील सर्व नागरिकांचे १०० टक्के कार्ड वाटप पूर्ण होईल, अशा गावांचा व उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरावर गौरव करण्यात येणार आहे.
या कार्डाद्वारे पात्र ज्येष्ठ नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या अंगीकृत रुग्णालयांमध्ये मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे. कार्डधारक प्रत्येक व्यक्तीला ५ लाख रुपयांचे उपचाराचे कव्हरेज या अंतर्गत मिळणार आहे.






