
धाराशिवमध्ये उपसा सिंचन योजना क्र. २ अंतिम टप्प्यात; १०,८६२ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ
धाराशिव जिल्ह्यातील सिंचनासाठी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत असलेली उपसा सिंचन योजना क्र. २ सध्या अंतिम टप्प्यात पोहोचली असून, भूसंपादन प्रक्रियेत येणारे अडथळे पोलीस बंदोबस्तात दूर करून कामांना गती देण्यात आली आहे. या योजनेद्वारे जिल्ह्यातील तुळजापूर, लोहारा व उमरगा तालुक्यातील एकूण १०,८६२ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी २.२४ अब्ज घनफूट पाण्याचा वापर करण्यात येणार असून, सीना नदीवरील घाटणे बॅरेज येथून सहा टप्प्यांद्वारे पाणी उपसा करून विविध प्रकल्पांमध्ये साठवण करण्यात येणार आहे. तुळजापूर तालुक्यातील रामदारा तलावात पाणी साठवून सिंचनासह पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
योजनेतील टप्पा क्रमांक १ ते ५ मधील बहुतांश कामे अंतिम टप्प्यात आहेत.
टप्पा क्र. २ (पडसाळी), टप्पा क्र. ३ (सावरगाव) आणि टप्पा क्र. ५ (सिंदफळ) येथील स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी कामे शंभर टक्के पूर्ण झाली आहेत.
टप्पा क्र. ४ (पांगरदरवाडी) येथील काम ९० टक्के पूर्ण झाले आहे.
टप्पा क्र. १ (भोयरे) येथील पंपगृहाचे काम सध्या ७५ टक्के पूर्ण झाले असून, पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
२०२५ मधील ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना नदीला पूर आला होता. त्यामुळे भोयरे येथील पंपगृहात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने काम काही काळ मंदावले होते. सध्या तेथील काम पुन्हा वेगाने सुरू आहे.
थेट खरेदीद्वारे भूसंपादनास शेतकऱ्यांचा विरोध, मोबदल्याबाबत असमाधान, उच्च न्यायालयात दाखल याचिका तसेच संबंधित गटांतील वाद यामुळे कामात अडथळे निर्माण झाले होते. मात्र प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात हे अडथळे दूर करून कामे सुरू ठेवली आहेत.
एकूण ४०.९६ कि.मी. कालव्यापैकी केवळ ५५० मीटर काम शिल्लक आहे.
तसेच १५.३० कि.मी. उर्ध्वगामी नलिकेपैकी केवळ ७०० मीटर काम बाकी आहे.
ही योजना पूर्ण झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला मोठा दिलासा मिळणार असून, सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचीही उपलब्धता वाढणार आहे. आगामी पावसाळ्यापूर्वी योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
डोंबिवली पश्चिमेलाही नव्याने होणार दुय्यम निबंधक कार्यालय, आमदार रवींद्र चव्हाण यांचा पाठपुरावा