धाराशिव उद्योग-गुंतवणुकीसाठी सज्ज; ७,५३४ कोटींच्या गुंतवणुकीतून ७,५०० रोजगारांची अपेक्षा
‘जिल्हा गुंतवणूक परिषद–धाराशिव २०२६’चे पालकमंत्री सरनाईक यांनी ऑनलाइन उद्घाटन केले. यावेळी ते मार्गदर्शन करत होते. परिषदेत ३७ उद्योगांसोबत तब्बल ७ हजार ५३४ कोटी ८५ लाख रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार असून, त्यातून सुमारे ७ हजार ५०० रोजगारनिर्मिती अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
“ही केवळ आकडेवारी नसून धाराशिवच्या हजारो कुटुंबांच्या आशा आणि तरुणांच्या रोजगाराच्या संधी आहेत. केवळ MoU होणे हे आपले ध्येय नसावे. MoU ते प्रत्यक्ष गुंतवणूक, गुंतवणुकीतून उद्योग आणि उद्योगातून रोजगार, हा आपला विकासाचा मार्ग असला पाहिजे,” असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
कृषी, कृषीपूरक उद्योग, अन्नप्रक्रिया, अक्षय ऊर्जा, पर्यटन तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळू शकते. कृषी व अन्नप्रक्रिया उद्योगांना स्थानिक उत्पादनांची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासोबतच वारा व सौरऊर्जा क्षेत्रातही मोठ्या संधी आहेत. ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनाला उद्योगाची जोड दिल्यास रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
उद्योगांसाठी जमीन आणि भांडवलासोबतच पायाभूत सुविधा, प्रशिक्षित मनुष्यबळ, वाहतूक व लॉजिस्टिक व्यवस्था आणि सकारात्मक प्रशासकीय दृष्टिकोन आवश्यक आहे. Ease of Doing Business, MAITRI 2.0, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP), PSI यांसह विविध योजनांचा उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही सरनाईक यांनी केले.
‘एक खिडकी’ पद्धतीने उद्योगांना आवश्यक परवानग्या व सुविधा सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. एमआयडीसी क्षेत्राचा विस्तार, लॉजिस्टिक सुविधा आणि औद्योगिक पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येणार आहे. उद्योग वाढला पाहिजे; मात्र त्यासोबत स्थानिक युवक, महिला, शेतकरी आणि छोट्या व्यावसायिकांना त्याचा मोठा लाभ झाला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आज झालेल्या सामंजस्य करारांचे प्रत्यक्ष उद्योगांमध्ये रूपांतर करण्यासाठी जिल्हा प्रशासन, उद्योग विभाग आणि संबंधित यंत्रणांनी प्रभावी समन्वय साधावा, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे विशेष आभार मानत त्यांनी गुंतवणूक परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल जिल्हा प्रशासन, उद्योग विभाग, एमएआयटीआरआय आणि संबंधित यंत्रणांचे अभिनंदन केले.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षीच्या गुंतवणूक परिषदेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून, त्यातून रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असल्याचे सांगितले. उद्योगांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच ना-देय प्रमाणपत्रांची कामे विनाविलंब मार्गी लावण्यासाठी दरमहा उद्योजकांच्या प्रश्नांचा प्रशासकीय पातळीवर आढावा घेतला जातो, अशी माहिती त्यांनी दिली. उद्योगवाढीसाठी सर्व घटकांना प्रोत्साहन, सुविधा आणि आवश्यक वातावरण उपलब्ध करून देणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असेही पुजार यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर विभागाचे उद्योग विभागाचे सहायक आयुक्त संजय भुरेवाल यांनी उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्या ‘मैत्री’ पोर्टलवर उपलब्ध असल्याची माहिती दिली. उद्योग पोर्टलवर ६० हजार उद्योग नोंदणीकृत असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा उद्योग विभागाचे सहायक आयुक्त अमोल बळे यांनी प्रास्ताविकात गुंतवणूक परिषदेमागील पार्श्वभूमी, कार्यक्रमाची रूपरेषा आणि जिल्ह्यातील उद्योग व रोजगाराच्या संधींची माहिती दिली.
धाराशिव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमर पाटील यांनी नवीन उद्योजकांना उद्योग केंद्राच्या माध्यमातून कर्ज व मार्गदर्शन उपलब्ध होत असल्याचे सांगितले. गरज ओळखून उद्योग उभारल्यास तो यशस्वी होण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले. उद्योग क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी ‘४ डी’ आवश्यक असून, त्यामध्ये Desire, Determination, Dedication आणि Discipline या चार बाबींचा समावेश होतो, असे पाटील यांनी सांगितले.
यावेळी धनश्री जाधव (समन्वय अधिकारी, मैत्री कक्ष, मुंबई तथा उपनिबंधक, भागीदारी संस्था, विधी व न्याय विभाग), संजय भुरेवाल, अमर पाटील, बाळासाहेब गीते, सुयोग अमृतराव, शिवराम तोतेवाड, देवा सुरवसे, मनोज घायाळ आणि राजाभाऊ कोंढारे यांच्यासह उद्योग क्षेत्रातील अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.






