तामलवाडी टोलनाक्यावर स्थानिकांच्या रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर (Photo - Social Media)
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी टोलनाका परिसरातील गाळाधारक शेतकरी, हॉटेल व्यावसायिक, दुकानदार, पान स्टॉल, दूध विक्रेते, स्नॅक्स सेंटर चालक यांच्यासह स्थानिक व्यावसायिकांना हटविण्याच्या प्रस्तावित कारवाईच्या निषेधार्थ धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी व तुळजापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी २१ ऑगस्ट रोजी शांततामय आंदोलन करण्यात आले.
टोलनाका परिसरात अनेक वर्षांपासून स्थानिक व्यावसायिक हॉटेल, दुकाने व विविध छोटे व्यवसाय चालवत असून, त्यावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. यातील बहुतांश व्यावसायिक शेतकरी असून, व्यवसायाच्या जागेच्या मागील बाजूस त्यांची शेती असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. त्यामुळे व्यवसाय हटविल्यास त्यांच्या उत्पन्नावर आणि कुटुंबांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
हॉटेल व दुकाने हटविण्याची कारवाई करण्यापूर्वी स्थानिकांच्या रोजगाराचा आणि उपजीविकेचा विचार करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच स्थानिकांच्या रोजगाराचे साधन असलेली दुकाने अतिक्रमणाच्या नावाखाली हटविणे योग्य नसल्याची भूमिका काँग्रेसने मांडली.
पालकमंत्र्यांनी परिसरात जमीन घेतली असून त्या ठिकाणी शेती, फळबाग किंवा रिसॉर्ट उभारणे हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. मात्र, त्यासाठी स्थानिकांच्या रोजगारावर परिणाम होईल अशी कारवाई करू नये, असे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक व्यावसायिकांचा रोजगार व उपजीविका अबाधित ठेवूनच प्रशासनाने पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली. संबंधित व्यावसायिकांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
पाण्यावरून राजकारण तापले! ‘विरोधकांनी पाणी पुरवठा योजनेवरुन…’; नगरसेवक विजय धट काय म्हणाले?
आंदोलनास जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर, धिरज पाटील, धनंजय राऊत, शिवाजी गायकवाड, अरविंद बेडगे, अमोल कुतवळ, दिलीप भोकरे, सयाजी देशमुख, राजेंद्र शेंडगे, गौरीशंकर मुळे, अझहर, गोपाळ सुरवसे, हणमंत गवळी, दादासाहेब चौधरी, सिद्धेश्वर अण्णा कस्तुरे, सुनिल माळी, सत्तार मुलाणी, गोविंद डोंगरे, डॉ. पंकज घुगे, पोपट मोटे, उत्तम दादा पाटील, संजय गुंजूटे, तुकाराम नवगिरे, ज्ञानेश्वर जगताप, सुमन नवगिरे, विकास वडणे, दीपक वडणे, अश्विनकुमार आतकरे, जुबेर शेख, संदीप सुरवसे, पेंदे, सौ. वाघे ताई शिंदे, भीमा रणसुरे, दादाराव नेटके, हरिदास घोटकर, निजाम शेख, तानाजी नेटके, बाळासाहेब गायकवाड यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी, दुकानदार व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






