
पावसाने दिली हुलकावणी; सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात, तातडीच्या मदतीची मागणी
या गंभीर परिस्थितीची दखल घेत धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांना पत्र देऊन नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिकांची झालेली सद्यस्थिती लक्षात घेऊन महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून तातडीने प्रत्यक्ष पाहणी, पंचनामे आणि नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी खासदार राजेनिंबाळकर यांनी केली आहे. या सर्वेक्षणात प्रत्यक्ष नुकसान झालेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांचा समावेश करून शासनाच्या निकषांनुसार तात्काळ पीक नुकसानभरपाई व आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
सोयाबीन हे धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. मात्र, पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके सुकण्याच्या अवस्थेत आहेत. परिणामी, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात शासनाने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आवश्यक आहे. नुकसानग्रस्त पात्र शेतकऱ्यांना कोणताही विलंब न करता मदत मिळावी, यासाठी शासनाने तातडीने निर्णय घेऊन प्रत्यक्ष मदत पोहोचवावी, अशी आग्रही मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे.
Dharashiv Farmers : 21 हजार शेतकऱ्यांसाठी खूशखबर! खात्यात कर्जमाफीचे 183.85 कोटी जमा