(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
धाराशिव जिल्ह्यातील पहिल्या यादीत समाविष्ट असलेल्या ज्या पात्र शेतकऱ्यांचे अद्याप आधार प्रमाणीकरण झालेले नाही, त्यांनी ते तातडीने पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर शासनाकडून कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे. तसेच उर्वरित पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
२४ ऑगस्टच्या लाभात धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १ हजार ३९८ लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर ८ कोटी ३८ लाख ३९ हजार ७७३ रुपये जमा झाले आहेत. यापूर्वी जिल्ह्यातील १२ हजार २१४ लाभार्थी शेतकऱ्यांना १०५ कोटी ८६ लाख रुपयांचा लाभ मिळाला होता. नवीन २१ हजार ७९३ लाभार्थ्यांच्या कर्जमाफीची भर पडल्याने धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३४ हजार ७ शेतकऱ्यांना २८९ कोटी ७२ लाख ४४ हजार ६६० रुपयांचा लाभ मिळाला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ ला २ जून रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानंतर १५ जुलैच्या शासन निर्णयानुसार योजनेच्या काही निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली. योजनेच्या कर्जमुक्ती आणि एकवेळ समझोता (OTS) घटकांच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील ३० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, १२ राष्ट्रीयीकृत बँका आणि इतर खासगी बँकांसह ५३ बँकांनी सुमारे ३२ लाख कर्जखात्यांची माहिती महा-आयटीच्या पोर्टलवर अपलोड केली. यात धाराशिव जिल्ह्यातील ९७ हजार ८७३ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
२५ जुलै रोजी योजनेच्या निकषांनुसार पात्र ठरलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांपैकी राज्यातील सुमारे १६.९६ लाख शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली. या यादीत धाराशिव जिल्ह्यातील सुमारे ४६ हजार ९१५ थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश आहे.
कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश शासनाने सर्व बँकांना दिले आहेत. योजनेसाठी २२ आणि ३० जुलैच्या शासन निर्णयांनुसार ७ हजार १ कोटी रुपये, तर १९ ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार आणखी ४ हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे योजनेसाठी राज्य शासनाने एकूण ११ हजार १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
दरम्यान, पहिल्या यादीत नाव असूनही आधार प्रमाणीकरण प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांनी विलंब न करता प्रमाणीकरण पूर्ण करावे. प्रमाणीकरणानंतर त्यांच्या कर्जखात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होणार असल्याने पात्र शेतकऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.






