
सातारा : जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटींग सुरू केली असल्याने जिल्ह्यातील सर्व धरणात पाणीसाठा वाढलेला आहे. त्यामुळे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात तब्बल ५० हजार क्युसेस पाण्याची आवक प्रतिसेंकद वाढली असून ४.२९ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. तर सातारा जिल्ह्यातील वीर धरण, उरमोडी धरण, मोरणा- गुरेघर मध्यम प्रकल्प, कण्हेर धरण, धोम बलकवडी धरण यामधून पाण्याचा विसर्ग आज सुरू करण्यात येणार आहे.
विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा सातारा जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. सध्या कोयना धरणात गेल्या चोवीस तासात ४.२९ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. पुढील दोन दिवस घाट परिसरात मूसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट हमावान खात्याने दिला असून काल दिवसभर आणि आजही पावसाने झोडपून काढले आहे.
वीर धरण १०० टक्के भरत आले आहे. आज दुपारी १२ वाजता नीरा नदीच्या पात्रात ८०० क्युसेस पाणी सोडले जाईल. उरमोडी धरणातून सकाळी ८ वाजता विद्युत गृहाद्वारे ५०० क्यूसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आले आहे. मोरणा धरणात सध्या ८०.६२% पाणी साठा असून सांडव्यावरुन १४९६ घ.फू./से. विसर्ग विसर्ग आहे तो वाढवून आता १४७४ घ.फू./से.ने सोडण्यात येणार आहे. आज सकाळी कण्हेर विद्युत गृहाद्वारे ५५० क्यूसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
[read_also content=”रश्मी शुक्लांविरोधात खटला चालविण्याची मंजूरी द्या; मुंबई पोलिसांची केंद्र सरकारकडे मागणी https://www.navarashtra.com/maharashtra/approve-prosecution-against-rashmi-shukla-demand-of-mumbai-police-to-central-govt-nrdm-314136.html”]
रात्रीत कोयना नवजा परिसरात २०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे १७५ मि. मी तर नवजा येथे २२६ मि. मी पावसाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वरला १९७ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे. पावसाचा जोर वाढल्याने अनेक धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. तेव्हा नदीकाठी जाणे लोकांनी टाळवे असे आवाहन केले आहे.