वैनगंगेच्या पात्रात मृत्यूचा प्रवास
भंडारा : देशात एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला आणि ‘डिजिटल इंडिया’च्या घोषणांनी आकाश दुमदुमले. मात्र, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या सीमेवर वास्तव काही वेगळेच आणि भयावह आहे. भंडारा जिल्ह्यातील इटाण आणि चंद्रपूर जिल्ह्यातील कोलारी या दोन गावांना जोडणारा रस्ताच अस्तित्वात नसल्याने, स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही इथली जनता वैनगंगेच्या विस्तीर्ण पात्रात जीव मुठीत धरून ‘डोंग्या’च्या (नाव) साह्याने प्रवास करत आहे.
विशेष म्हणजे, हा भाग राज्याच्या दोन बड्या राजकीय नेत्यांचा बालेकिल्ला मानला जातो. इटाण हे गाव काँग्रेसचे नेते आणि आमदार नाना पटोले यांच्या साकोली मतदारसंघातील शेवटच्या टोकाचे गाव आहे. तर, नदीच्या पलीकडील कोलारी हे गाव भाजपचे आमदार बंटी भांगडिया यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघात येते. एका बाजूला विरोधी पक्षाचे वजनदार नेते आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधारी भाजपचे शक्तिशाली आमदार असतानाही, या दोन गावांना जोडणारा पूल का होऊ शकला नाही, असा संताप सवाल आता विचारला जात आहे.
हेदेखील वाचा : मराठवाड्यातील 11 धरणांत 81 टक्के पाणीसाठा; मध्यम प्रकल्पांमध्ये 75 टक्क्यांहून अधिक साठा
पूल नसल्याने पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रस्ता नसल्याचा फटका केवळ दळणवळणाला बसतोय असे नाही, तर इथल्या सामाजिक जीवनावरही याचे गंभीर परिणाम झाले आहेत. पावसाळ्यात वैनगंगा नदी जेव्हा दुथडी भरून वाहते, तेव्हा या भागाचा संपर्क पूर्णपणे तुटतो. आजारी रुग्ण असो वा गर्भवती महिला, त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी डोंग्याशिवाय पर्याय उरत नाही. अनेकदा या दळणवळणाच्या समस्येमुळे तरुणांचे विवाह जमण्यात अडचणी येतात. रस्ता आणि पूल नसल्यामुळे अनेक सोयरीकी तुटल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. अमृत महोत्सवाच्या झगमगाटात इटाण आणि कोलारीच्या ग्रामस्थांच्या नशिबी मात्र वैनगंगेच्या पात्रातील काळोखच आहे.
पुलाच्या निर्मितीसाठी 100 कोटी मंजूर पण…
मी खासदार असताना केंद्र सरकारने या पुलाच्या निर्मितीसाठी १०० कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, त्यानंतर केंद्राने उर्वरित निधी थांबविल्याने पुलाचे काम रखडले. परिणामी, आजही नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
– नाना पटोले, आमदार
या पुलाची निर्मिती झाली तर भंडारा आणि चंद्रपूर या सीमावर्ती भागातील शेतकरी, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना मोठे पाठबळ मिळेल. शिक्षण आणि व्यापारासाठी हा मार्ग अत्यंत सोयीस्कर होईल, पण शासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही.
– संदीप मोटघरे, ग्रामस्थ, इटाण






