पुणे : पैसा, मोठी रुग्णालये, कॉर्पोरेट क्षेत्र यामुळे आरोग्य क्षेत्रात बरेच बदल झालेत. जीवन शैलीबाबत आपल्या सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळेच ‘हेल्थ इकॉनॉमिक्स’ हे जगातील सर्वात गुंतागुंतीचे आणि न सुटणारे कोडे बनले असून, ते सोडविणे अतिशय अवघड आहे,’’ असे मत प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले. तसेच हे माझे व्यक्तीगत मत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
पी. एम. शाह फाउंडेशनच्या वतीने ११ व्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन तुकाराम मुंढे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अरुण गद्रे, पी. एम शहा फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. किरण कोठडीया, विश्वस्त डॉ. विक्रम काळुस्कर, फाउंडेशनचे संचालक अॅड. चेतन गांधी, सतीश कोंढाळकर, एनएफडीसी- एनएफएआयचे व्यवस्थापक जसबीर सिंग आदी उपस्थित होते.
तंत्रज्ञानामुळे तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता
मुंढे म्हणाले, “आज आरोग्य सुविधा वाढल्या आहेत, तंत्रज्ञानाचा वापरही वाढला आहे. हल्ली आपले आरोग्य कसे असायला हवे, हे आपण स्मार्ट वॉच’कडून जाणून घेतो, तर आरोग्याच्या समस्येबाबत गुगल डॉक्टरकडून उपाय केले जातात. हे अतिशय दुर्दैवी आहेत. कारण हे तंत्रज्ञान केवळ तुम्हाला हवे, तेच सांगते. अशा तंत्रज्ञानामुळे तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता अधिक असते. आर्टीफिशल इंटेलिजन्सचा वापर नक्कीच करा. पण आर्टीफिशल जीवन जगू नका.’’
विचारपद्धती, आहार पद्धती बदलली तर आरोग्य चांगले होईल
“ जीवनशैलींचे आजार ही आजच्या काळातील सर्वात मोठी आरोग्य समस्या आहे. आपल्यापैकी अनेक जण मधुमेह ते उच्च रक्तदाब अशा विविध प्रकारच्या आजारांनी त्रस्त आहेत. आपल्या आरोग्यासाठी आपण पुरेसा वेळ देत नाही. थोडा वेळ स्वत:साठी द्यायला सुरुवात केली तर जीवनात महत्वाचा बदल होईल. त्याचबरोबर आपल्याला आपली विचारपद्धती आणि आहार पद्धती बदलली पाहिजे. त्याबाबत केवळ बोलून नाही, तर कृती करणेही गरजेचेच आहे. असे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.’’