विदर्भातील दक्षिण भागात पावसाची काहीशी उघडीप; पूरस्थिती कायम, जनजीवन विस्कळीतच (सौजन्य : iStock)
मुंबई : पुढील दोन ते तीन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील काही भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
राज्याच्या अनेक भागात हलका-मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीला पुढील दोन दिवसात उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
हेदेखील वाचा : Rain Update : पुण्यासह परिसरात मुसळधार पाऊस; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पावसाने राज्यातील अनेक ठिकाणी उघडीप दिल्याचे पाहिला मिळत होते. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होताना दिसून आला. त्यानंतर आता मंगळवारी (दि.24) सकाळपासूनच पुण्यासह परिसरात मुसळधार पाऊस झाला. अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याचेही दिसून आले आहे. दरम्यान, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
कोल्हापूर, सांगलीला पावसाचा इशारा
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाकडूनही पावसाचा अंदाज
सोमवारी संध्याकाळी हवामान विभागानेही पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यामध्ये पुढील 24 तासांत पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग येथे बहुतेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असेही सांगण्यात आले होते. त्यानंतर आता हा अंदाज खरा ठरताना दिसत आहे.