चाकणनंतर आता हिंजवडीत खराब रस्ते अन् वाहतूक कोंडी आयटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
Hinjawadi IT Park traffic: चाकण आंदोलनानंतर, हिंजवडी-मान-मरुंजी येथील राजीव गांधी आयटी पार्कमधील खराब पायाभूत सुविधांवरून स्थानिक रहिवासी आणि आयटी व्यावसायिकांचा संताप शिगेला पोहोचला आहे. तुटलेले रस्ते, जीवघेणे खड्डे, रोजची वाहतूक कोंडी, अपुरा पाणीपुरवठा आणि प्रशासकीय दुर्लक्ष याला कंटाळून आयटी कर्मचारी, स्थानिक रहिवासी आणि शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
हिंजवडी-मान-मरुंजी परिसरातील रहिवासी कल्याण संघटनेने रस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधले आहे. गेल्या काही वर्षांत आयटी आणि निवासी विकास वेगाने झाला असला तरी, पायाभूत सुविधा पूर्णपणे कोलमडल्या आहेत. वेगाने लोकसंख्या वाढ होऊनही रस्ते, वाहतूक, पाणी आणि इतर नागरी सुविधा अविकसित राहिल्या आहेत.
प्रस्तावित रस्ते आणि रुंदीकरण प्रकल्पांसाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. जमीन मालकांना योग्य मोबदला देण्यात यावा आणि रस्त्यांच्या बांधकामास विलंब न लावता सुरुवात करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मान-शिवाजीनगर मेट्रो लाईन क्रमांक ३ युद्धपातळीवर पूर्ण करून सेवा लवकर सुरू करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे, त्यामुळे तातडीच्या दुरुस्ती उपाययोजना लागू करण्याची मागणी त्यांनी केली आहे. नागरिकांनी सात दिवसांच्या आत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलावण्याचा अल्टिमेटम दिला आहे.
Nagpur News : मुलींच्या स्वच्छतागृहासाठी विद्यार्थ्यांचा आक्रोश; मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
हिंजवडी-मान-मरुंजी आणि आसपासच्या परिसराच्या एकात्मिक विकासासाठी नवीन महानगरपालिका स्थापन करण्याची मागणी तीव्र झाली आहे. यासाठी शासकीय प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे.






