सौजन्य - सोशल मिडीया
कोल्हापूर : कसबा बावडा येथे शिवसेना ठाकरे गटाचे उप-शहरप्रमुख राहुल माळी यांना बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. दोन्ही गटाचे एक हजार कार्यकर्ते आमने-सामने आल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. आमदार सतेज पाटील यांनी समजूत काढत जमावाला शांत केले.
शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना दुसरीकडे जाण्याचे आवाहन केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. राहुल माळी (रा. जयभवानी गल्ली, कसबा बावडा) यांनी रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी निधी दिल्याचा व्हिडिओ काही व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल केला होता. याबाबत बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास त्याला एका तरुणाने फोन करून धमकावले. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास भगवा चौकात शिवसेनेचे कार्यकर्ते सुनील जाधव आणि माळी यांनी एकमेकांना गद्दार असे संबोधल्याने वादाला सुरुवात झाली.
आदर्श सुनील जाधव याने माळी यांचा गळा पकडून धक्काबुक्की केली. हा प्रकार समजताच कार्यकर्त्यांनी भगवा चौकात धाव घेऊन गर्दी केली. त्याचवेळी मतदान केंद्रांची पाहणी करण्यासाठी आलेले राजेश क्षीरसागर आणि सत्यजीत कदम भगवा चौकातील एका हॉटेलमध्ये थांबले होते. जमावाने हॉटेलच्या बाहेर गर्दी करताच आमदार सतेज पाटील भगवा चौकात पोहोचले. त्यांनी शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांच्याशी चर्चा करून क्षीरसागर आणि कदम यांना दुसरीकडे पाठवण्यास सांगितले. त्यानुसार टिके यांच्या विनंतीनुसार क्षीरसागर आणि कदम निघून गेले. आमदार पाटील यांनी संतप्त जमावाची समजूत काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर १० मिनिटे ठिय्या मारला. काही वेळाने कार्यकर्ते निघून गेले. मात्र, या घटनेने सुमारे तासभर कसबा बावडा येथे प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
हे सुद्धा वाचा : पुण्यात बार अँड रेस्टाँरट फोडले, दारूच्या बाटल्यांची चोरी; नेमकं काय घडलाय प्रकार?
जमाव वळविल्याने अनर्थ टळला
दत्त मंदिर कॉर्नर येथील बलभीम विद्यालयाजवळ तरुणांची गर्दी झाली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून क्षीरसागर आणि कदम सुनील जाधव आणि त्यांचा मुलगा आदर्श यांना आपल्या गाडीत घेऊन ते निघून गेले. काही तरुणांनी क्षीरसागर यांच्या गाडीचा पाठलाग केला. कवडे गल्लीच्या कोपऱ्यावर गाडी थांबल्यानंतर जमावाने क्षीरसागर यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आमदार सतेज पाटील यांनी भगवा चौकात धाव घेऊन जमावाला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे वळविल्याने अनर्थ टळला.