अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर तपासाची मागणी करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर भाजप खासदार बिप्लब कुमार देब यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “अजित पवार हे आमच्या कुटुंबातीलच आहेत, ते आमचे उपमुख्यमंत्री होते. ममता बॅनर्जी बोलोत किंवा न बोलोत, या घटनेचा तपास होणारच आहे.”
देब पुढे म्हणाले, “इतक्या मोठ्या नेत्याचा मृत्यू झाला आहे. त्यासाठी आम्ही ममता बॅनर्जी काय म्हणतात याची वाट पाहायची का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
त्याचबरोबर त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या राज्यातील घटनेचा उल्लेख करत पलटवार केला. “पश्चिम बंगालमध्ये एका कारखान्यात लागलेल्या आगीत २५ ते ३० मजूर जळून मरण पावले, त्याला तीन दिवस झाले. मात्र त्या घटनास्थळी ममता बॅनर्जी गेल्याच नाहीत, इतकेच नाही तर त्यांनी फोन करूनही विचारपूस केली नाही,” असा आरोप त्यांनी केला.
“अशा व्यक्तीकडून सहानुभूतीची अपेक्षा तरी कशी ठेवायची? त्यांनी मानवतेलाच संपवले आहे,” अशी कठोर टीकाही बिप्लब कुमार देब यांनी केली.














