'माझं बालसाहित्य वाचायचं वय नाही', राऊतांच्या पुस्तकावर फडणवीसांची बोचरी टीका
‘मी बालसाहित्य वाचत नाही आणि कथा -कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही’, असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या पुस्तकावरून लगावला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं उद्या ज्येष्ठ साहित्यिक व चित्रपट पटकथालेखक जावेद अख्तर यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशन होणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे हे विधान भारतासाठी धोकादायक…; आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला रोष
पुस्तक प्रकाश कार्यक्रमाला शिवसेनेच (ठाकरे गट) उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार व तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. नरकातला स्वर्ग या पुस्तकात केलेल्या दाव्यावरून प्रकाशनापूर्वीच राजकीय गोंधळ सुरू झाला आहे. संजय राऊत १०१ दिवस आर्थर रोड तुरुंगात ईडीच्या कोठडीत होते. २०२२ मध्ये पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्डरिंग प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. राऊत यांनी या काळात तुरुंगातील अनुभवांवर ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तक लिहिलं आहे.
संजय राऊतांच्या या पुस्तकात ‘राजा का संदेश साफ हैं’ नावाचं एक प्रकरण असल्याचा दावा केला जात आहे. गृहमंत्री अमित शहा यांना बाळासाहेब ठाकरे यांनी गुजरात दंगली आणि इतर गुन्ह्यांमधून कसं वाचवलं याबाबत आणि दोघांमधील भेटीविषयी सविस्तर लेखण केलं आहे. यावरून राजकीय वादंग उठलं आहे. दरम्यान पत्रकारांनी याबाबत देवेंद्र फडणवीसांना विचारलं असता त्यांनी राऊत यांच्या या पुस्कावर खोटक टिप्पणी केली आहे. “मी कथाकादंबऱ्या वाचणं सोडून दिलं आहे. बालवाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही. ते कोणी मोठे नेते नाहीत, प्रसारमाध्यमांनी त्यांना सोडून द्यावं’, असं म्हणत त्यांनी राऊतांना टोला लगावला. चित्रा वाघ यांनीही या पुस्ककाचं नाव ‘नरकातला स्वर्ग नव्हे तर ‘गटारातील अर्क’ असं पाहिजे होतं, असं वक्तव्य केलं आहे.