
Maharashtra political crisis 2026, NCP Congress merger, NCP NDA alliance rumors
NCP Merger: राज्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटात सामील झाल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गोटातूनही तशाच काहीशा बातम्या पसरू लागल्या आहेत. या अंतर्गत बंडाळीवर तोडगा काढण्यासाठी शरद पवार यांची राष्ट्रवादी मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटात काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याच्या चर्चा सुरू आहेत. तोच दुसरीकडे एक गट एनडीए मध्ये विलीनीकरण करण्याची मागणी करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
गेल्या चार वर्षांत राज्यातील प्रादेशिक पक्ष भाजप प्रणित एनडीएमध्ये सामील होताना दिसत आहेत. त्यातच आमदार खासदारांच्या फुटण्यामुळे पक्षांचे राजकीय समीकरणही बदलून गेले आहे. दोन आठवड्यांपूर्वी ठाकरेंचे खासदार फुटल्यानंतर आमदारदेखील फुटणार असल्याचा दावा सत्ताधारी नेत्यांकडून केला जाऊ लागला. खासदारांच्या फुटीमुळे ठाकरे पुन्हा एकदा बॅकफुटवर गेले. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनही अंतर्गत घडामोडी सुरू आहेत. आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीबाबतही अशा चर्चा सुरू झाल्याने राष्ट्रवादी विलीन करण्याच्या विचारात आहेत. त्यातही आमदारांमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील काही आमदार काँग्रेसमध्ये विलीन होण्याची मागणी करत आहेत, तर दुसरा गट भाजपमध्ये विलीन व्हावे, अशी मागणी करत आहेत. मतदारसंघातील कामे होत नसल्यामुळे आमदारांची अडचण होते, असे आमदारांचे म्हणणे आहे. दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्यांनी कोणतीही अधिकृत भूमिका मांडली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनाही काँग्रेससोबत एकत्र येण्याचा प्रस्ताव दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. तृणमूल काँग्रेसमधील काही आमदार आणि खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यात प्राथमिक स्तरावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात ममता बॅनर्जी १५ ऑगस्टपर्यंत भूमिका स्पष्ट करू शकतात, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
दरम्यान, महाराष्ट्रातही काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येण्याच्या शक्यतेवर केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चांना अधिक चालना मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातही या मुद्द्यावर वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि वरिष्ठ नेतृत्व या विषयावर कोणती भूमिका घेते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विरोधी पक्षांच्या संभाव्य एकजुटीबाबतच्या चर्चांमुळे आगामी राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.