
संजयकाका पाटील यांचा भाजप प्रवेश ऐनवेळी रद्द (Photo Credit- X)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संजयकाका पाटील यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा होती. त्यानुसार कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी प्रवेश सोहळा रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. प्रवेश का रद्द झाला, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी पक्षांतर्गत चर्चा, राजकीय समीकरणे किंवा अन्य कारणांमुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, संजयकाका पाटील यांच्या भाजप प्रवेशाकडे जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. हा प्रवेश झाल्यास तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, ऐनवेळी झालेल्या या घडामोडीमुळे पुढील निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, संजयकाका गटाचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे यांनी सांगितले की, विधानमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर तासगाव येथे भव्य जाहीर कार्यक्रमात संजयकाका पाटील यांचा भाजप प्रवेश व्हावा, अशी विनंती कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने मुंबईतील प्रवेश सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.