मुंबई आणि उपनगरात मराठा आंदोलकांनी मोठ्या प्रमाणाक धुमाकूळ घातला आहे. कुठे वाहतूक कोंडी, कुठे नाका बंदी तर कुठे रेल्वे थांबवल्याने प्रवाशांचा होणारा खोळंबा. आंदोलनाचा आज चौैथा दिवस असून सीएसएमटी रेल्वे स्थानकात आंदोलनातील काही जणांनी अतिरेक करत उभ्या असलेल्या लोकलमधील मोटारमनच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे मध्य रेल्वे अर्धा तास उशीराने धावत असून दादर, कुर्ला आणि परळ स्थानकातील प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. सीएसएमटी स्थानकात ठीय्या मांडत आंदोलकांनी रेल्वे थांबवली. तसंच रेल्वे स्थानक परिसरात कबड्डी आणि खोखो खेळत प्रवाशांच्या नाकी नऊ आणले. आंदोलन करताना रेल्वे स्थानाकात कोणत्याही प्रकारे प्रवाशांचा खोळंबा होईल अशा प्रकारे वागणूक करु नका, रेल्वे स्थानकात कोणताही गोंधळ घालू नका असं मनोज जरांगेंंच्या निर्देशाचे तीन तेरा करत जमावाने मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला.
मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलीस प्रशासनाने सखोल नियोजन केले आहे. सीएसएमटी आणि चर्चगेट स्थानकात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करून प्रवासी व आंदोलकांची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना रेल्वे पोलीस स्टेशनमार्गे बाहेर सोडले जात असून आंदोलकांना आझाद मैदानाकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग देण्यात आला आहे. सीएसएमटी स्थानकातील आंदोलकांना थांबण्यासाठी विशेष रोप बांधून व्यवस्था केली आहे. नियमित प्रवासी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आंदोलकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सीपी राकेश कलासागर यांनी केले.याचपार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे यांनी अतिरेक करणाऱ्या आंदोलकांचा चांगलाच समाचार घेतला. गोष्टी संयमाने घ्या नाहीतर तुम्ही आमच्यातले नाही असं समजलं जाईल.
आंदोलनाच्या नावाखाली प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या आंदोलकांवर जरांगे पाटील चांगलेच भडकले. याचबरोबर त्यांनी सत्ताधारी सरकारचाही चांगलाच समाचार घेतला आहे. जरांगे पाटील म्हणाले की, गेले चार वर्ष आम्ही आमचा हक्क मागतोय आम्हाला मुंबईत यायची हौैस नाही. पोरं हुल्लडबाजी करतायत ते दिसतं पण सरकार गेली कित्येक दिवस हुल्लडबाजी करत आहेत ते दिसत नाही का ? या सरकारला आम्ही 2 वर्षांचा वेळ दिला मात्र हाती निराशाच आली. त्यामुळे आता जोपर्यंत आमच्या मागण्य़ा मान्य होत नाही तोवर आम्ही मुंबई सोडणार नाही असा इशाराच जरांगे पाटलांनी दिला आहे.