मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा शरद पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले, मोठा अन्याय...
कराड : अभयसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले होते. १९९९ साली स्व. अभयसिंहराजे भोसले काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत आले नसते तर कदाचित काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रीपदी बसविले असते. विलासराव देशमुख यांच्यापेक्षा भाऊसाहेब महाराज ज्येष्ठ असताना पक्षाचे नेते शरद पवार यांनी त्यांना का बाजूला केले, संधी का दिली नाही, हे माहीत नाही. परंतु, यामुळे सातारा जिल्ह्यासह राज्याचे मोठे नुकसान झाले. कर्तुत्व असतानाही जाणीवपूर्वक डावलने हा भाऊसाहेब महाराजांवर झालेला मोठा अन्यायच होता, अशी सल सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली.
नुकतीच राज्याच्या सार्वजनिक मंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर येथील प्रीतिसंगमावरील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी मंगळवारी त्यांनी अभिवादन केले. याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना एका प्रश्नाच्या उत्तरादाखल ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार आनंदराव पाटील, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड उत्तरचे नेते रामकृष्ण वेताळ, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, राजेश पाटील – वाठारकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, भाजप तालुकाध्यक्ष पै. धनाजी पाटील, माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, सारिकाताई गावडे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व मंत्री जयकुमार गोरे यांचे यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी स्वागत केले.
सातारा जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला
मंत्री भोसले म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राची उभारणी केली. त्यांच्या प्रेरणेने व विचारांवर भाऊसाहेब महाराजांनंतर आम्ही मार्गक्रमण करत आहोत. साताऱ्याने महायुतीला भरभरून यश दिले आहे. त्यामुळे सातारा जिल्हा हा आता भाजप, महायुतीचा बालेकिल्ला झाला आहे. त्यामुळेच आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी भाजप व मित्रपक्षांना मिळून तब्बल चार मंत्रीपदे दिली असून, आम्ही सर्वजण मिळून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देणार आहोत. यासाठी चव्हाण साहेबांचे आशीर्वाद व प्रेरणा घेऊन आम्ही कामाला सुरुवात करत आहे.
पालकमंत्री पदासाठी कोणाच्याही नावाची चर्चा नाही
पालकमंत्री पदाबाबत आपल्या नावाची चर्चा? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, पालकमंत्री पदासाठी सध्या कोणाच्याही नावाची चर्चा नसून, याबाबत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून निर्णय घेतील, तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून जिल्ह्यात रस्त्याचे चांगले जाळे निर्माण करणार असून, सर्वांनी बांधकाम विभागाची सर्व कामे, रस्ते, पूल आदी कामे दर्जेदारपणे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. उदयनराजे आणि आमच्यात कधीही वाद नव्हता. नगरपालिका निवडणुकीवेळी एका वार्डात दोन्हीकडील कार्यकर्ते इच्छूक असल्याने काहीवेळा वादाचे प्रसंग उद्भवले. परंतु, भविष्यात आता अशा प्रकारचे वाद होणार नाहीत, असेही त्यांनी यावेळेस स्पष्ट केले.
उरमोडी प्रकल्प मार्गी लावला
भाऊसाहेब महाराजांनी उरमोडी प्रकल्प मार्गी लावला. त्यामुळे मोठे क्षेत्र आज सुजलाम, सुफलाम झाले आहे. त्यांना अधिक संधी मिळाली असती, तर सातारा जिल्ह्यासह राज्याचाची चांगला विकास झाला असता, अशी खंतही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केली. रामराजे आणि तुमच्यातील वादावर पडदा पडला आहे का? या प्रश्नावर बोलताना मंत्री गोरे म्हणाले, आमच्यातील वाद वैचारिक होता. परंतु, फलटण म्हणजे कोणाची वैयक्तिक जहागिरी नाही. जनता हीच फलटणची जहागिरी आहे. असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.