अरे चाललंय तरी काय? बाप्पाच्या आगमन मिरवणुकीवर इमारतीतून अंडी फेकली? माझगावमध्ये दोन गटांत बाचाबाची, पोलिसांचा फौजफाटा
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील माझगाव परिसरात गणपती बाप्पाच्या आगमन मिरवणुकीदरम्यान तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. ‘माझगावचा मौर्य’ गणपती मंडळाच्या आगमन मिरवणुकीच्या दिशेने शेजारील एका इमारतीतून अंडी फेकण्यात आल्याचा गंभीर आरोप मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
मुंबईची मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात; फडणवीस सरकारला दाखवलं ‘रेड कार्ड’
‘माझगावचा मौर्य’ गणपती मंडळाचे उपसचिव विवेक राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडळाच्या गणपती बाप्पाची वाजतगाजत आगमन मिरवणूक काढण्यात आली होती. मोठ्या संख्येने भाविक आणि स्थानिक नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणूक मंडपाच्या दिशेने जात असताना मंडपापासून सुमारे ३० ते ४० मीटर अंतरावर असलेल्या एका इमारतीतून मिरवणुकीच्या दिशेने अंडी फेकण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे मिरवणुकीत सहभागी भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली. हा प्रकार भाविकांच्या भावना दुखावणारा असून, यामागे असलेल्या व्यक्तींवर पोलिसांनी तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
अंडी फेकल्याचा प्रकार समोर आल्यानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिक आणि भाविक संतप्त झाले. त्यानंतर दोन गटांमध्ये वाद आणि बाचाबाची झाल्याचे सांगण्यात येत आहे. रस्त्यावर मोठी गर्दी असल्याने परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती.या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करून दोन्ही बाजूंच्या नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर गर्दी पांगवण्यात आली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
अंडी नेमकी कोणी फेकली, ती कोणत्या इमारतीतून फेकण्यात आली आणि या घटनेमागील नेमके कारण काय होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून त्यातून संबंधित व्यक्तींची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही घटना संवेदनशील असल्याने परिसरातील परिस्थितीवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये तसेच सामाजिक सलोखा आणि शांतता कायम राखावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, अंडी फेकल्याबाबत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपाची स्वतंत्रपणे पडताळणी आणि पोलीस तपास सुरू असल्याने दोषी कोण, तसेच या घटनेमागील हेतू काय होता, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.






