मुंबईची मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात
मुंबई : मुंबईतील मोकळी मैदानं आणि खेळाच्या जागा वाचवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलनाची सुरुवात केली आहे. वांद्रे येथील नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानाचे आरक्षण बदलू नये, या मागणीसाठी आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत तिरंगा आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी मुंबईतील मैदानांच्या प्रश्नावर राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेन-झीतील तरुणांनी स्क्रीनऐवजी मैदानावर अधिक वेळ घालवावा, असे म्हटले होते. याच वक्तव्याचा संदर्भ घेत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना थेट सवाल केला. ‘तरुणांनी मैदानावर असावे म्हणता, पण तुम्ही मैदानं ठेवताय कुठे?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मुंबईतील मोकळी मैदानं, रिक्रिएशन ग्राऊंड आणि प्ले ग्राऊंड यांचे अस्तित्व कायम राहिले पाहिजे, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली. गेल्या चार वर्षांत मुंबईतील 17 पेक्षा अधिक मैदानांचे आरक्षण निवासी किंवा व्यावसायिक वापरासाठी बदलण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानाचा उल्लेख करताना या जागेचे क्षेत्रफळ सुमारे 2.58 हेक्टर असल्याचे त्यांनी सांगितले. हे मैदान खेळासाठीच कायम राहावे आणि त्यावर काँक्रिटीकरण होऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.
आदित्य ठाकरे यांनी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचाही मुद्दा उपस्थित केला. मैदानांच्या वापरासंदर्भात काही संस्थांना आणि खासगी घटकांना मिळणाऱ्या सुविधांवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी, ‘आम्ही आमच्या मैदानासाठी का पैसे मोजायचे?’ असा सवाल केला.
I hope to see you join us today To save Mumbai’s open spaces being gifted to the BJP’s friends by the regime First protest: Today
5 pm
Neville D’Souza Football Turf
Bandra West pic.twitter.com/hhBiHE0kFO — Aaditya Thackeray (@AUThackeray) August 23, 2026
मुंबईतील विविध मोकळ्या जागांवर बांधकामाचा दबाव वाढत असल्याचा आरोप करत त्यांनी मैदान वाचवण्याची लढाई मोठ्या प्रमाणात उभी करण्याचे संकेत दिले. मुंबईतील नागरिकांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
‘काल पेड इव्हेंट म्हणालात, मग आजचा काय?’; जेन झी संवादावरून संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल
दरम्यान, आंदोलकांनी सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी रेड कार्ड दाखवले. मुंबईची मैदानं आणि मोकळ्या जागा वाचवण्यासाठी पुढील काळातही आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. उच्च न्यायालयाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिल्याबद्दल त्यांनी न्यायालयाचे आभारही मानले.






