"युती तोडून उबाठाला महाविकास आघाडीत बसवण्याची किती दलाली घेतली", प्रकाश महाजन यांची संजय राऊतवर खरमरीत टीका
बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश महाजन यांनी सांगितले की, मुंबई महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ७ पैकी ६ नगरसेवक किती पैसे देऊन फोडले, त्यासाठी कोणत्या गुजराती कंत्राटदाराकडून पैसे घेतले, असे सवाल महाजन यांनी राऊत यांना केले. खोक्याची भाषा बोलणाऱ्यांना पैशांशिवाय काही दिसत नाही, अशी टीका महाजन यांनी ठाकरेंवर केली. राऊत २५ वर्ष खासदार असताना त्यांनी मराठी माणसासाठी केलेली किमान पाच दाखवावी, अशी टीका महाजन यांनी केली. एकनाथ शिंदेंवर आरोप करणारे राऊत हा खासदारच्या रुपात दिल्लीच्या वर्तुळात वावरणारा दलाल आहे, अशी घणाघाती टीका महाजन यांनी केली. राऊत यांची कॉलर धरणारी महिला कोण, असा सवाल महाजन यांनी केला.
उबाठा मुख्यमंत्री होण्यासाठी पदयात्रा करणाऱ्या दिवंगत चिंतामण रुईकर या कार्यकर्त्यांच्या कुटुंबाची उबाठाला भेट घ्यायला वेळ मिळाला नाही. मात्र याच रुईकर कुटुंबासाठी घर बांधून देण्याचे काम एकनाथजी शिंदे यांनी केले, असे महाजन म्हणाले. शिंदेंना द्यायचे माहित आहे तर ठाकरेंना घ्यायचे माहित आहेत, असे ते म्हणाले. महायुतीत कोणतीही कुरबुरी नाही, तिन्ही भाऊ मजबुतीने सरकार चालवत आहेत, असे महाजन म्हणाले. मुंबई तोडणार याच गोष्टीवर मागील ३० वर्ष ठाकरे राजकारण करत आहेत. गुजरातची प्रगती बघायला राज ठाकरे स्वत: गेले होते. मुंबईतील मराठी माणूस आणि मुंबईवर त्यांचे प्रेम नाही तर ही निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची आहे, अशी टीका महाजन यांनी केली. मुंबईत साधा एसटीपी प्लांट करु शकले नाहीत. इतकी वर्ष महापालिका सत्तेत असताना काहीच कामे केली नाहीत. आता आश्वासने देत आहेत, पण त्यांच्या हातात सत्ता गेली तर शिवसेना भवनाचा मॉल होऊ नये, असा टोला महाजन यांनी लगावला.
परळीमध्ये शिवसेनेची राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती होती. सत्तास्थापनेसाठी त्यांनी गट स्थापन केला आहे, असे महाजन म्हणाले. छत्रपती संभाजी नगरात मुस्लिम कंत्राटदारांना कंत्राटे देणाऱ्या अंबादास दानवे यांनी केले. एमआयएमच्या मतांवर दानवे विधान परिषदेवर गेले होते, अशी टीका महाजन यांनी दानवेंवर केली.






